मुंबई – कोरेगाव भीमा येथे दरवर्षी लाखो आंबेडकर अनुयायी शौर्यदिन साजरा करण्यासाठी एकत्र येतात. याच अनुषंगाने महाराष्ट्र करनी सेनेचे प्रमुख अजय सेंगर यांनी शौर्य दिनाला विरोध दर्शवल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
करनी सेनेच्या विरोधानंतर आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”हि कुठली? कोण? करणी सेना अवतरली महाराष्ट्रात. उगाच कारण नसताना भीमा कोरेगावचे नाव घेत स्तंभ उध्वस्त करून टाकू अशी भाषा बोलत महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम केले जात आहे. आणि हे जाणून बुजून केले जात आहे. कोणाच्या बापाची हिम्मत नाही भीमा कोरेगावच्या स्तंभाला हात लावायची.” आपल्या पुढच्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात,”जो कोण हे बोलला आहे त्याला पोलिसांनी त्वरीत अटक करावी. याबाबत पुढे काही झाल्यास ह्याला करणी सेनाच जबाबदार राहील”
हि कुठली? कोण? करणी सेना अवतरली महाराष्ट्रात. उगाच कारण नसताना भीमा कोरेगाव चे नाव घेत स्तंभ उध्वस्त करून टाकू अशी भाषा बोलत महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम केले जात आहे. आणि हे जाणून बुजून केले जात आहे. कोणाच्या बापाची हिम्मत नाही भीमा कोरेगावच्या स्तंभाला हात लावायची.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 30, 2022
“भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आमच्या शौर्याच प्रतिक आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारीला तिथे जाऊन आमच्या पूर्वजांना मानवंदना देत होते. तेंव्हा सुद्धा त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्याची कोणी हिम्मत केली नव्हती.होय आम्हीही तिथे जाणार आणि आमच्या पूर्वजांना मानवंदना देणार..!” असंही आव्हाड यांनी ट्विटद्वारे ठणकावून सांगितले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
करनी सेनेचे अजय सेंगर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका मांडली होती. इंग्रजांकडून लढलेल्या गद्दारांचा शौर्यदिन कसा काय साजरा होऊ शकतो ? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित करत शौर्य दिनावर बंदी घालण्याची मागणी करणार असल्याचे म्हंटले. या लढाईला जातीय लढाईचे स्वरूप देऊ नये अशी देखील मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सेंगर यावेळी म्हणाले होते. सेंगर यांच्या विधानांवरून आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.