मुंबई: विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नरहरी झिरवाळ, तर भाजपकडून डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला. उद्या, शनिवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून अर्ज मागे घेतला न गेल्यास तर उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत सत्तारूढ पक्षाकडून राष्ट्रवादीचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ, तर विरोधी पक्षाकडून डॉ. अशोक उईके यांनी अर्ज भरले आहेत. उद्या, शनिवारी अर्ज माघारीची मुदत दुपारी 4 वाजेपर्यंत आहेत. या मुदतीत दोनपैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही तर संध्याकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत मतदान होईल. मात्र, भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे येथेही माघार घेण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल.