कोपरगाव – दारणा, गंगापूर धरणांवर वाढत्या बिगरसिंचन पाण्याचा फटका गोदावरी कालव्याच्या शेतीसिंचनास बसत आहे. त्यामुळे सभागृहात हे बिगरसिंचन पाणी आरक्षण सर्व धरणांवर टाकावे, म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले. पण सिंचनाच्या पाण्याला आपलीच राष्ट्रवादी कॉंग्रेसची मंडळी आडवी आली. विधिमंडळात ते दुटप्पी भूमिका घेतली, अशी टीका आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली.
जिल्हा मार्ग 4 ते ब्राम्हणगाव-टाकळी-कोपरगाव-कोकमठाण-सडे-शिंगवे या नऊ किलोमीटर रस्त्याच्या दोन कोटी 76 लाख 97 हजार रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन आमदार कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक निवृत्ती बनकर यांनी विकासकामांची माहिती दिली. माजी सभापती सुनील देवकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपअभियंता प्रशांत वाकचौरे, दगूराव चौधरी, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, चांगदेव रावजी आसने, नानासाहेब चौधरी, संदीप देवकर, संदीप चौधरी, साईनाथ आहेर, सोमनाथ वहाडणे, संजय जगताप, पुंडलिक देवकर, रामदास देवकर, चंद्रकांत देवकर, सादिक शेख, अनुराग येवले, धोंडिबा सांगळे, फकिरा वाकचौरे, रामदास पवार, भिकाभाऊ देवकर, संजय वाकचौरे, अंबादास देवकर, रंभाजी पगारे, मनीष देवकर यांच्यासह धारणगाव, ब्राम्हणगाव, टाकळी सोनारी पंचक्रोशीतील मंडळी उपस्थित होती.
आमदार कोल्हे म्हणाल्या, गावकी व भावकी करत बसाल, तर विकासाला मुकाल. कुणी काहीही कानात सांगून जाईल. त्याला बळी पडाल, तर आपल्याच पायावर आपण कुऱ्हाड मारून घ्याल. शेती सिंचनाच्या पाण्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचीच मंडळी आडवी आल्याचे रेकॉर्डिंग विधिमंडळात उपलब्ध आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यानं आपलं खूप मोठं नुकसान झालं आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ कोपरगाव मतदारसंघातील अनेकांना मिळवून देण्यासाठी आपण पाच वर्षे प्रामाणिकपणे काम करून पाठपुरावा केला. दहा वर्षांत केलेले काम आणि आपली पाच वर्षे याचा तौलनिक लेखाजोखा कार्यकर्त्यांनी मांडावा. म्हणजे विरोधकांची बोलतीच यातून बंद होईल.आम्ही काम करतो खोटं कधीही बोलत नाही, असेही त्या म्हणाल्या.