भाजपाचा धार्मिक रडीचा डाव दिल्लीकरांनी ओळखला
मुंबई: अहंकारी राजकारणापोटी भाजपाने दिल्ली गमावली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. दिल्लीने अशा धार्मिक मुद्द्यांना संपूर्णपणे नाकारत ‘आप’च्या विकासाच्या अजेंड्याला पसंती दिली. खरं तर दोन वर्षात तब्बल सहा राज्यांमध्ये भाजपाचा झालेला पराभव पाहता भाजपाकडून खेळला जाणारा धार्मिक रडीचा डाव जनतेला पटत नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढे भाजपाने निवडणुका या विकास आणि जनतेच्या मुद्द्यांवर लढवल्या जातात, अहंकारावर नव्हे, ही खूणगाठ आता बांधायला हवी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दिला आहे.
देशात जाणीवपूर्वक धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या भाजपाला दिल्लीकरांनी सपशेल नाकारले, हे आम आदमी पार्टीला मिळालेल्या एकतर्फी कौलावरून स्पष्ट होते. गेले काही दिवस नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने सीएए, शाहीन बाग या मुद्द्यांवर प्रचारनीती अवलंबली. भाजपाविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवले गेले. दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपने दिग्गज नेत्यांची फौजही प्रचारात उतरवली गेली. पण तरीही भाजपाला दिल्लीची सत्ता खेचून आणण्यात यश आलं नसल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.