– मधुकर गलांडे
बिजवडी – कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे बिगुल वाजले असून अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी (दि. 24) शेवटचा दिवस असून बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसला सक्षम उमेदवार न मिळाल्यानेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली का, अशी चर्चा सध्या कारखाना कार्यक्षेत्रात रंगली आहे.
या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निवडणुक लढवावी असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते; मात्र निवडणुक लडवण्यासाठी जी पात्रता लागते त्या पात्रतेत किती राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते उतरत होते हा संशोधनाचा विषय झाला आहे.
या तालुक्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अनेक वर्षांपासून कर्मयोगीला ऊस न घालता शेजारील तालुक्यातील साखर कारखान्यांना घालत आहे. ज्या पद्धतीने कर्मयोगीकडे ऊस घालण्यासाठी पाठ फिरवली जाते त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही पाठ फिरवली गेली. किमान आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठीतरी प्रश्न उपस्थित करणे आवश्यक होते.
राष्ट्रवादीचा नेता अथवा पुढारी कर्मयोगीच्या वार्षिक सर्वसाधारण एक वर्ष अपवाद वगळता आलेले दिसले नाहीत. त्यामुळे पंचवर्ष शांत असणाऱ्या पक्षाच्या अचानक निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर लोक येतीलच कसे?
जर इंदापूर तालुक्यातील पहिल्या फळीतील नेतेच कारखान्याची निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत तर बाकीच्यांनी का लढाव अशी चर्चा सध्या कारखाना कार्यक्षेत्रात सुरू आहे.
इंदापूर तालुक्यात ज्याज्या वेळी अजित पवार यांच्या सभा झाल्या त्यात्या वेळेस इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उसाच्या बाबतीत दिलासा देताना सांगतात आपल्या पक्षाच्या विचाराच्या कार्यकर्त्यांनी उसाची गाळपाची काळजी करू नये,
त्यांचा उस आपल्या कारखान्याला गाळपासाठी नेऊ. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कर्मयोगीच्या ऐवजी पवारांच्या कारखान्याला ऊस घालण्यास प्रधान्य देतो. खरतर मतदानाची परवा न करता ऊस घालतात त्यांना कारखान्याची चिंता कशाची आला काय आणि नाही आला काय?
हर्षवर्धन पाटलांची मुत्सद्देगिरी आली कामी
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहेच नाकारता येत नाही. कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रात जर पॅनल उभे करण्यापुरते उमेदवार मिळत नाहीत का? मिळतीलही मात्र त्याची तयारी ही फार आगोदरच करायला हवी होती ती झाली नाही. कार्यकर्ता संभ्रमात होता.
उलट हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवार आणि त्यांची नावे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच ठेवली. पण मतदार यादी बनवताना जी मुत्सद्देगिरी पाटील यांनी दाखवली ती आज नक्कीच कामाला आली हे मात्र नक्की.
प्रदीप गारटकरांनी 24 तासांत निर्णय फिरवला?
कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीसाठी जर सक्षम उमेदवार मिळाए तर शेतकरी, कामगार हितासाठी निवडणूक लढवू असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषद घेत बुधवारी (दि. 22) जाहीर केले होते.
तर गुरुवारी (दि. 23) पुन्हा आपला निर्णय बदलत निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करून 24 तासातच निर्णय फिरवल्याने नक्की काय राजकारण शिजते आहे, याबाबत कारखाना कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगली आहे.