खटाव -आम्ही गेले दीड- दोन वर्ष करोना काळामध्ये चांगलं काम केलं. आम्हांला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत व राहतील. आम्ही त्यांचा आजही आदर करतो. पण उद्धव साहेब आजारी असताना राज्याच्या खजिनदाराने आमच्यावर अन्याय केला. सर्व पैसा माझाच म्हणून कसं चालेल. तो राज्याचा पैसा आहे घरातला नाही. बारामतीला किती पैसे दिले ते जाहीर करा. खजिनदाराची जबाबदारी सर्वांना समान न्याय द्यायची आहे. करायचं पाप राष्ट्रवादी कॉंग्रेसने आणि फेडायचं शिवसेनेने हे किती दिवस चालणार, शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना त्रास सहन करावा लागला. म्हणून स्वतःची आमदारकी डावावर लावली आम्ही. या कारणांमुळेच उठावाचा निर्णय घ्यावा लागला, असे आमदार महेश शिंदे यांनी खटाव येथील नागरी सत्काराला उत्तर देताना स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या बदलांचे साक्षीदार आमदार महेश शिंदे यांचे खटाव येथे आगमन होताच त्यांचं समर्थकांनी एकच जल्लोष केला.आमदारांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले. तसेच आमदार महेश शिंदेचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. खटाव ग्रामपंचायत, यशवंत विकास सेवा सोसायटी, केशवराव पाटील विकास सेवा सोसायटी व आजी माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमरसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव कुदळे, राहुल जमदाडे, दीपक घाडगे, पोपटराव भराडे, दादा मोहिते, मोहन भराडे, बबनराव धुमाळ, राजेंद्र करळे, दीपक विधाते, जिम काझी, ताजुद्दिनभाई शिकलगार, विशाल देशमुख आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, आमदार महेश शिंदे विचार मंचचे सदस्य, जनसेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, यशवंत विकास सेवा सोसायटीचे सर्व संचालक, केशवराव पाटील विकास सेवा सोसायटीचे सर्व संचालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, “लक्ष्मणराव इनामदार उपसा जलसिंचन योजना पूर्णत्वास जात असताना अनेक अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना ही योजना पूर्णत्वास जाऊ द्यायची नव्हती. तलावातील पाणी सोडताना अनेक अधिकारी अंगात भूत आल्यासारखं करतात. आता यांच्या अंगातील भूत उतरावं लागणार. एक रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो याचा आम्हाला अभिमान आहे.’ महाविकास आघाडीत असताना आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. पण आमची राष्ट्रवादीने पुरती जिरवली. महाराष्ट्रातील सगळ्या शिवसैनिकांची जिरवली. म्हणूनच निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक अशोकराव कुदळे यांनी केले. राहुल शिंदे यांनी आभार मानले.
उदयनराजे नव्हे तुम्ही खंडणीखोर
कोणाचही नाव न घेता आमदार महेश शिंदे म्हणाले, “उदयनराजे खंडणीखोर आहेत असं तुम्ही म्हणता. महाराजांना खंडणीची गरज नाही. त्यांची प्रॉपर्टी भरपूर आहे. तुमची प्रॉपर्टी कुठून आली ते जनतेला सांगा. तुम्ही खंडणीखोर आहात. आता सगळं बंद करायचे आहे.’
आमचा निर्णय ऑन द स्पॉट
आमचा निर्णय ऑन द स्पॉट असेल. बघू, करू असलं आमच्या सरकारमध्ये नसेल. मागील दोन वर्ष विकास कामे भरपूर केली. खटाव गावाच्या विकासासाठी सहा कोटी मंजूर केले आहेत. संपूर्ण गावात कॉंक्रिटीकरण, सुशोभीकरण होणार आहे. पाच कोटी सत्तर लाखाचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे. लोणी, भोसरे, थकटवाडी, खटाव रस्त्याची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.