मुंबई – भारतामध्ये शेतकरी, शेतमजूर आणि कारखान्यात काम करणारा कामगार असे दोन कष्टकरी वर्ग आहेत. मोदी सरकारने कष्टकरी वर्गाला दुखवलेले आहे. कामगार कायद्यात शिथिलता आणली आहे. भांडवलदारांचे संरक्षण करण्याचा पण भाजपने केलेला आहे. कामगारांचे संरक्षण काढून घेऊन दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे ( Farmer Protest )भवितव्य अंधारात जाईल, असे कायदे केंद्र सरकारने केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
दिल्लीत मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु असताना ते शेतकरी दिल्लीत येऊ नयेत म्हणून सीमेवर रस्त्याला खिळे ठोकणे, बॅरिकेट्स लावणे असे प्रकार सुरु आहेत. पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर असे केले असते तर आम्ही स्वतः मोदी सरकारचे अभिनंदन केले असते.
इतिहासात जेव्हा मराठेशाही दिल्लीवर चाल करुन गेली तेव्हा बहादुरशहा जफर याने अशाच प्रकारे तटबंदी लावली होती. मात्र तरिही मराठ्यांनी ती तटबंदी भेदली होती, असे जयंत पाटील म्हणाले.
नरेंद्र मोदीही राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर उभे राहिले तरी आपण ती जागा जिंकू शकतो – जयंत पाटील
पुढे पाटील म्हणाले की, आज देशातील शेतकरी देखील दिल्लीपतींनी आपले म्हणणे ऐकावे म्हणून दिल्लीत जात आहे. तर दिल्लीचा नेता, देशाचा प्रमुख सीमेवर खिळे ठोकून स्वतःचे संरक्षण करुन घेत आहे. भाजप ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, त्यावरुन केवळ पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा शेतकरीच नाही, तर देशभरातल्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा केली असती, तर हा प्रश्न याआधीच सुटला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले.