मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसने मतदारसंघनिहाय आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, माजी खा. देविदास पिंगळे, तर दिंडोरी मतदारसंघासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार यांची नावे पुढे आली. मात्र, निवडून येण्याची क्षमता व मतदारसंघातील राजकीय स्थितीच्या सर्वेक्षणानंतर निर्णय घेण्यावर या बैठकीत एकमत झाल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली असून प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. एकिकडे महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आघाडीतील तिनही पक्षांनी बैठक घेऊन वातावरण तापवायला सुरूवात केली आहे.
संबंधित मतदारसंघांतून कोण जोरदार टक्कर देऊ शकतो, मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती, गेल्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते, महाविकास आघाडीतील घटकपक्षांचा विचार करता मतदारसंघात असलेली पक्षीय ताकद, शिवसेना, कॉंग्रेसच्या वाट्याला कोणते मतदारसंघ येऊ शकतात अशा विविध मुद्द्यांवर वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याचे समजते.
संभाव्य उमेदवार व जिंकून येण्याची क्षमता याची चाचपणी केल्यानंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेण्याचा विचार या बैठकीतून पुढे आल्याचे समजते. महिला उमेदवार म्हणून शेफाली भुजबळ यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार यांच्या नावाचा पर्याय असू शकतो.
चांदवडची जागा राष्ट्रवादीकडे?
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 4 जागांवर राष्ट्रवादीचे आमदार आहेत. बाजार समिती निवडणुकीत मनमाड बाजार समितीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. देवळा, चांदवड जि.प गटात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळे या जागेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच विधानसभा निवडणुकीत चांदवडची जागा राष्ट्रवादीकडे घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.
तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघात खासदार गोडसे आणि देशपांडे यांचा अपवाद वगळता खासदार दुसऱ्यांदा रिपीट होत नसल्याचा इतिहास आहे, असा मुद्दा माजी आमदार हेमंत टकले यांनी मांडला. त्यामुळे जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर नवीन चेहऱ्याचाच शोध घेण्याचाही मुद्दा यावेळी पुढे आला.