पिंपरी – रावेत, बोऱ्हाडेवाडी आणि चऱ्होली या तीन ठिकाणी महापालिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधणार आहे. त्याची चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी (दि. 11) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार होती. मात्र, राष्ट्रवादीच्या हट्टी व अतिरेकीपणाला बळी पडून पालिका आयुक्तांनी राजशिष्टाचाराचे कारण देत ही सोडत अचानक रद्द केली. राष्ट्रवादीने लोकशाहीचा गळा घोटला असून, त्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांनी केली आहे.
सर्वसामान्य नागरिक आपल्या हातातली कामे सोडून सोडतीसाठी आली होती. या महानगरात घराचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेचा राष्ट्रवादी व पालिका प्रशासनाने भ्रमनिरास केला आहे. ही एकप्रकारे सर्वसामान्य जनतेची फसवणूक आहे.
भाजपने सर्वसामान्य जनतेचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी आवास योजना आणली. मात्र, निमंत्रणावरून राष्ट्रवादीने राजकारण केले. राष्ट्रवादीला जनतेचे हित महत्त्वाचे आहे की पक्षाचे नेतेमंडळी? याचा त्यांनी आधी खुलासा करावा.
लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या राष्ट्रवादीने जनतेची माफी मागावी. अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवेल, असा इशारा नगरसेवक शैलेश मोरे यांनी दिला आहे.