इस्लामपूर – तीन दिवसाचे लॉकडाऊन शहराच्या आरोग्य हितासाठीच असून आम्ही काही करणार नाही आणि तुम्हीही काहीही करायचे नाही. ही राष्ट्रवादीची भूमिका दुर्दैवी असल्याची टीका विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना शहरातील आरोग्य विषयाचे गांभीर्य नसून हे लोक स्वत: पाठ थोपटून घेण्यात पटाईत आहेत. जरा शहरात आपले कर्तव्य म्हणून प्रामाणिक काम करा म्हणजे गांभीर्य समजेल, असेही ते म्हणाले.
लॉकडाऊनच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, रेठरेधरण येथील एक करोनाग्रस्त रुग्ण शहरातील रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला मुंबईला घेऊन जाणारी रुग्णवाहिका व वाहक शहरातीलच असल्याने करोना परत शहरात पसरु नये यासाठीच नगरपालिकेने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या डोक्याला व हाताला शहरात काही काम शिल्लक नसल्याने व मंत्री, त्यांचे वारसपूत्र शहरात कुठे फिरकत नसल्याने ही मंडळी अस्वस्थ आहेत.
शहरात चांगले काम करणाऱ्यांच्या पायात पाय घालत आहेत. सार्वत्रिक प्रयत्नाने करोना आटोक्यात आला आहे. या बैठकींना उपनगराध्यक्ष, गटनेते, ज्येष्ठ नगरसेवक आनंदराव मलगुंडे, विश्वनाथ डांगे उपस्थित होते. त्यांच्याकडून शहाजी पाटील व त्यांच्या नेत्यांनी माहिती घ्यावी. लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी प्रांताधिकाऱ्यांना माहिती दिली होती. बैठकीला बोलावूनही राष्ट्रवादी आली नाही यावरून त्यांना किती गांभीर्य आहे हे लक्षात येते.
ते म्हणाले, प्रकाश हॉस्पिटलमध्ये जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार 10 बेडचा राखीव वार्ड करोना रुग्णांसाठी तयार करण्यात आला आहे. शहाजी पाटील यांना करोनाची काही लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तात्काळ संपर्क करावा. कारण तेही शहरातील एक नागरीक आहेत व त्यांची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्यावर योग्य उपचार करुन त्यांना घरी पोहचविले जाईल. शहर करोनासारख्या महाभयंकर संकटाच्या दाढेत अडकले होते.
यावेळी शहरातील नगराध्यक्ष निशिकांत पाटील हे कर्तव्य समजून दिवसरात्र काम करत होते. मात्र, या शहरातील नागरिकांच्या संकटावेळी मंत्री व त्यांचे युवराज मुंबईत चारभिंतीच्या आत बसून होते. मंत्री व त्यांचे युवराज कुठे आहेत? याची संपूर्ण शहरात चर्चा होऊ लागल्याने मंत्री पाटील यांनी चक्क फेसबुकवरुन संवाद साधत शहरातील जनतेसाठी काम करणाऱ्यांना पुढारी होऊ नका, घरात बसा असा सल्ला देऊन चक्क मी काय करणार नाही तुम्ही काय करायचं नाही हेच स्पष्ट केले. मंत्री पाटील यांनी शहरातील जनतेची काळजी करू नये. भाजपाचे शहरअध्यक्ष अशोकराव खोत, नगरसेविका कोमल बनसोडे, सुभाष शिंगण, भास्कर कदम, संजय जाधव, प्रसाद पाटील, चंद्रकांत पाटील, गजानन पाटील उपस्थित होते.