बिबवेवाडी (हर्षद कटारिया)- तळजाई वसाहत येथे लुंकड ट्रस्ट शाळेलगतच्या समाज मंदिरावर अनधिकृत मोबाइल टॉवर उभारून त्याचे भाडे खासगी व्यक्तीकडून आकारले जात होते; परंतु याबाबत काहीच माहिती नसल्याचे क्षेत्रीय कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणातून महापालिकेची लाखो रुपयांची फसवणूक झाली असल्याचे उघड असताना पालिका प्रशासनाकडून संबंधित प्रकरणी फौजदारी तक्रार का दाखल केली जात नाही, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.
क्षेत्रीय कार्यालयाकडून याप्रकरणी हात झटकण्याची भूमिका घेतली जात असल्याने या प्रकरणातील “आर्थिक’गुढ मोठे असल्याचे तसेच यामध्ये बड्या धेंड्यांचा सहभाग असल्यानेच केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार क्षेत्रीय कार्यालयाकडून केला जात असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. आर्थिक फसवणूक झाल्यामुळे फौजदारी कारवाई करण्याचे धाडस पालिका का करीत नाही? असा सवाल आता विरोधक करू लागले असून निवडणुकीच्या तोंडावर मुद्दा सापडल्याने सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सरासावले आहेत.
नागरिकांच्या कररूपी पैशातून बांधलेल्या समाज मंदिरावर अनधिकृतपणे टॉवर उभारून कोणी खासगी व्यक्ती नगरसेवकाच्या सहकार्यातून वैयक्तिक स्वरूपात फायदा करून घेत असेल तर अशा संबंधित बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर मार्गाने तातडीने फौजदार गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.
– सुभाष जगताप, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
सदर समाज मंदिराचे काम माझ्या विकास निधीतून करण्यात आले होते. मात्र, समाज मंदिरावर टॉवर बांधलेले आहे हे “प्रभात’मधील वृत्त वाचल्यानंतर मला समजले. सदर पालिकेच्या मिळकतीवर अनधिकृतपणे टॉवर उभारणे चुकीची बाब आहे.
– महेश वाबळे, नगरसेवक भाजप
कोणाच्याही घरात अनोळखी इसमाने ताबा घेत ती मिळकत भाड्याने दिली तर त्याला नोटीस देत बसण्याऐवजी सामान्य नागरिक फौजदारी कारवाईच करेल? प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही सदर प्रकरणात फौजदारी कारवाई करायला हवी. टाळाटाळ होत असेल तर अप्रत्यक्ष चोरांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे.
– संतोष जोरे, सामाजिक कार्यकर्ता
महानगपालिकेच्या मिळकतीवर कोणीही यावे अनधिकृत मोबाइल टॉवर बसवावे आणि त्याचे भाडे घ्यावे, विशेष म्हणजे याबाबत वृत्त आल्यानंतर प्रशासनाला याची माहिती कळावी हे सगळे न पटण्यासारखे आहे. संबंधित मोबाइल कंपनी विरोधातही फौजदारी कारवाई केल्यास संपूर्ण भ्रष्टाचाराची पाळेमुळे समोर येतील. याबाबत आम्ही आयुक्तांना निवेदन देणार आहोत.
– निखिल शिंदे, अध्यक्ष, नमस्कार प्रतिष्ठान