मुंबई – राष्ट्रवादीचे मंत्री, राज्यमंत्री सर्व खासदार तसेच आमदार एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री रिलीफ फंडात पूरग्रस्त लोकांसाठी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. त्यानंतर या घोषणेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अधिक माहिती दिली.
अजित पवार यांनी वेतन देण्यासंबंधीची घोषणा केली आहे. तसेच आगामी एक-दोन दिवसात नेमकी काय मदत केली जाईल हे पक्षाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल, असेही मलिक यांनी सांगितले आहे.
नवाब मलिक म्हणाले, सरकार आपल्या परीने मदत करेल. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून आणखी मदत देता येईल का याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सर्वांशी चर्चा करुन घेत आहेत. त्यामुळे एक-दोन दिवसात नेमकी काय मदत केली जाईल, हे पक्षाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले.
तसेच आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूराने कोकण, सातारा, सांगली याठिकाणी अपरिमित हानी झाली आहे. दरड कोसळून जवळपास 251 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 100 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत.
यासह मुंबई, पुणे, अमरावती याठिकाणीही पुराने परिस्थिती अवाक्याबाहेर गेली होती. या नुकसानग्रस्त लोकांना एसडीआरएफच्या नियमानुसार मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे, असे त्यांनी सांगितले.