मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज सकाळपासून ठाण्यातील तीन हात नाक्याजवळ मुख्य महामार्गावर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे.
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांसह आमदार जितेंद्र आव्हाड हे आज राजभवनावर धडकणार होते. यात २० बससह खासगी गाड्यांचा समावेश होता. दरम्यान, हा ताफा मुंबईच्या दिशेने जात होता मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठाणे पोलिसांनी या सर्व गाड्या आनंदनगर टोलनाका येथे अडवल्या आहेत.
पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. आमदार जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकही ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की झाल्याचे देखील समोर आले आहे, याशिवाय आंदोलक कार्यकर्त्यांकडून महामार्ग रोखण्याचा देखील प्रयत्न झाला असून, मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा दाखल झालेला आहे. आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत.