NCP Merger : गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे (शरद पवार गट आणि अजित पवार गट) एकत्रिकरण किंवा विलीनीकरण (NCP Merger) होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, आता दोन्ही गटांनी वेगवेगळे मार्ग निवडल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणामागची ‘आतली गोष्ट’ प्रसारमाध्यमांसमोर उघड केली असून, विलीनीकरणाचा (NCP Merger) विषय आता पूर्णपणे संपल्याचे जाहीर केले आहे. शशिकांत शिंदेंनी उघड केले पडद्यामागचे कारण काही काळापूर्वी शरद पवार आणि दिवंगत नेते अजित पवार अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकवटणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर ही चर्चा पूर्णपणे रखडली आणि आता दोन्ही गटांमधील अंतर अधिकच वाढले आहे. विलीनीकरणाचा मुद्दा नेमका का संपला? कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावर सविस्तर भाष्य केले. विलीनीकरणाचा मुद्दा संपल्याचे जाहीर करत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. शिंदे म्हणाले, आमच्यासाठी शरद पवार हाच पक्षाचा मुख्य आणि महत्त्वाचा चेहरा आहे.अजित दादांच्या निधनानंतर विलीनीकरणाबाबत जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पसरवण्यात आल्या. NCP Merger जणू काही विलीनीकरणाची गरज शरद पवार गटालाच आहे, असे चित्र भासवायचा प्रयत्न झाला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या विषयावर आम्ही जर आता तोंड उघडले, तर ही गोष्ट खूप पुढे जाईल, असा इशारा शिंदेंनी विरोधकांना दिला. भाजपच्या कोंडीमुळे विलीनीकरणाचा प्रयत्न? अजित पवारांच्या भूमिकेवर बोलताना शशिकांत शिंदे यांनी एक मोठा दावा केला. “अजित दादा स्वतः विलीनीकरणाची चर्चा करत होते आणि तशी त्यांची इच्छाही होती. भारतीय जनता पक्ष (BJP) ज्या पद्धतीने आपल्या मित्रपक्षांची कोंडी करत आहे, ते ओळखून अजित दादा कदाचित सावध झाले असावेत आणि म्हणूनच त्यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला असावा,” असे शिंदे म्हणाले. मात्र, आता परिस्थिती बदलली असून हा विषय आमच्यासाठी पूर्णपणे संपला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण नुकतीच अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, शिंदे यांनी यावर पूर्णविराम लावला आहे. “विलीनीकरणाचा विषय आता इतिहास जमा झाला आहे. त्यावर यापुढे कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने आणि सक्षमपणे स्वतंत्र पक्ष म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करणार आहोत.” असे शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले. दीड महिन्यात राज्यभर पक्षबांधणी विलीनीकरणाच्या चर्चा बाजूला ठेवून आता शरद पवार गटाने आगामी काळासाठी कंबर कसली आहे. पक्षबांधणीची सुरुवात कोल्हापुरातून केली जात असून, येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करून पक्ष संघटना अधिक मजबूत केली जाईल, असा विश्वासही शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.