मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे दिग्गज नेते अनेक दिवसानंतर एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. प्रख्यात लेखक अंबरिश मिश्र यांच्या ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. या प्रकाशन सोहळ्यानिमित्त हे तिन्ही पक्षातील दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहेत. या तिन्ही नेत्यांसह खासदार सुप्रिया सुळे यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
पत्रकार, लेखक अंबरीश मिश्र यांनी आज भेट घेतली. 'चौकात उधळले मोती' हे त्यांचे नुकतेच प्रकाशित होत असलेले पुस्तक त्यांनी भेट दिले. धन्यवाद. pic.twitter.com/GhcMGbD2xO
— Supriya Sule (@supriya_sule) October 21, 2020
राज ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार हे खूप दिवसानंतर एका मंचावर येणार आहेत. उत्तम वक्ते असलेले तिघेही यावेळी कोणती टोलेबाजी करणार तसेच तिघांमध्ये कोणत्या गप्पा रंगणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात रंगत आहे.
दरम्यान, संजय राऊत आणि राज ठाकरे या दोघांनीही शरद पवार यांची मुलाखत घेतलेली आहे. 2017 मध्ये पुण्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. ही महामुलाखत चांगलीच गाजली होती.