मयुर सोनावणे
जिल्ह्यातील गावागावात चर्चा फक्त…
सातारा – केंद्रात पुन्हा एकदा बहुमतात आलेल्या भाजपने सध्या विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. विशेष म्हणजे सत्तेची लालसा असणाऱ्यांना सत्तेशिवाय जगणं शक्य नसल्याने जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर राज्यातील विविध प्रमुख आसामींनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती पवारांच्या साताऱ्याच्या बालेकिल्ल्यातही पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आता गावागावांत “राष्ट्रवादीचं काय खरं नाही गड्या.’ अशी एकच चर्चा ऐकायला मिळू लागली
आहे.
तसं पाहिलं तर आजवर पवारांना सातारा जिल्ह्याने बरंच दिलं, त्यामुळेच तर सातारा जिल्हा पवारांचा म्हणजेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र, एखादं दुसरं मंत्रिपद (किती महत्वाचं ते त्यांनाच माहीत) वगळता पवारांनी जिल्ह्याला फार काही दिलं नाही. माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत असताना माढ्याला बारामतीचे वैभव प्राप्त करून देण्याच आश्वासन त्यांनी दिलं होत. पवारांच्या उमेदवारीमुळे फार काही नाही पण दुष्काळी भागाची तहान भागेल, असा आशावाद इथल्या भोळ्याभाबड्या जनतेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, मात्र पवारांकडून त्यांची निराशाच झाली. सातारा जिल्हा हा धरणाचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो, मात्र डझनभर लहान मोठी धरणे जिल्ह्यात असतानाही जिल्ह्याच्या पूर्वेचा भाग कायम तहानलेलाच राहिला.
जिल्ह्यातील पाणी पॅकबंद कालव्याद्वारे सांगलीला गेले, माण- खटावच्या तोंडापुढून हे पाणी जात असताना याच पाण्यासाठी आजही येथील जनतेला संघर्ष करावा लागत आहे, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे आहेत, मात्र या पर्यटनस्थळांचा विकासही पवारांच्या शिलेदारांना म्हणावा तसा करता आला नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यात नव्याने रोजगार निर्मिती होणे गरजेचे असताना तसे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. मुळात यासाठी या शिलेदारांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून पाठबळ मिळणं गरजेचं होतं. पण, तसे काहीही झालं नाही. यासह अनेक प्रश्न जिल्ह्यात आजही प्रलंबित आहेत.
भाजप सरकारने विकासाच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळेच देशातील जनतेने पुन्हा एकदा केंद्रात भाजपला बहुमताने निवडून दिले. विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रादेशिक पक्षातील अनेकांनी भाजपशी संलग्न होत निवडणुका लढल्या आणि जिंकल्याही. आता काही दिवसांवर विधानसभा निवडणुका लागणार आहेत.
यामध्येही बहुमतात राज्यात सरकार आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी या मोठ्या ताकदीच्या पक्षांनाही घाम फुटला आहे. या दोन्ही पक्षतील खंबीर नेतेही आता आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन भाजपमध्ये दाखल होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेपासून, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायतीच नव्हे तर सोसायटीचे पदाधिकारी सदस्यही भाजपशी सलगी करू लागले आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असणाऱ्या वाई, कोरेगाव, सातारा, कराड उत्तर आणि फलटण या मतदारसंघातही आता भाजपचं बळ वाढले एवढेच नव्हे तर खंबीर नेतृत्वही मिळाले आहे. त्यामुळे भाजपच्या विजयाच्या आशा वाढल्या आहेत, असं मानलं जात आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेलाही पूर्वीइतका भरघोस उत्साह जाणवत नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीची गळती आता थांबणार नाही, हेच दर्शवणारी स्थिती पुढे येऊ लागली आहे.
एकंदरीत जिल्ह्याच्या राजकारणात झपाट्याने बदलत असणाऱ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखण्यात पवारांसह उरलेल्या शिलेदारांना कितपत यश मिळणार, हे विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या तरी जिल्ह्याच्या गावागावांतील पारावर “राष्ट्रवादीच यावेळी काय खरं नाही गड्या’ एवढीच चर्चा सुरू आहे.