मुंबई – गेल्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली होती. फडणवीस- खडसे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान या भेटीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस माझ्याकडे १२-१८ तास राहायचे. जेवणही माझ्याकडे करायचे… झोपायचेही. देवेंद्र फडणवीस त्या कालखंडात माझ्या बी-४ बंगल्यावर बऱ्याचदा असायचे,” असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
एकनाथ खडसे मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्तेत आले पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे. आमचं सरकार येणार आहे, थोडे दिवस थांबा हे सरकार पडणार आहे अशा स्वरुपाचे आमदारांना सांगून दिवस काढत आहेत. असा चिमटा खडसे यांनी यावेळी काढला आहे.
आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे. कारण मीच त्यातील अनेकांना प्रवेश तसंच तिकिट दिले होते. माझ्याशी ते मोकळेपणाने बोलतात. जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल नाराजी जाहीर करतात. असे लोक पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये त्यासाठी कदाचित अशी वक्तव्यं केली जात असतील,” अशी शंका एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात जळगावच्या दौऱ्यावर होते. दरम्यान १ जून रोजी फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली होती. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घऱी येऊन गेले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी असून आमचे संबंध चांगले आहेत. एकनाथ खडसे यांचंही त्यांच्याशी बोलणं झालं. भाजपाची खासदार असताना नेते आल्यानंतर त्यांना घरी बोलावणं आणि चहा पाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे. फडणवीसांच्या भेटीबद्दल रक्षा खडसे यांनी असे स्पष्टीकरण दिले होते.