औरंगाबाद – भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये सत्तेवर आल्यास राज्यातील नागरिकांना करोनाची मोफत लस देण्याचे जे आश्वासन दिले आहे त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने टीका केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी या संबंधात म्हटले आहे की निवडणूक सुरू असलेल्या बिहारमध्ये भाजपने केलेली ही घोषणा देशातल्या अन्य नागरिकांवर अन्याय करणारी आहे.
आम्हीही महाराष्ट्रात करोनाची लस मोफत देणार आहोत असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. ते म्हणाले की जागतिक आरोग्य संघटनेने 31 डिसेंबर 2019 ला करोनाच्या प्रसाराच्या धोक्याची जाणिव करून देणारा इशारा दिला होता. त्याचवेळी देशाच्या सीमा सील करून योग्य उपाययोजना केली असती तर देशात इतक्या मोठ्या प्रमाणात करोनाचा फैलाव झाला नसता.
करोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना स्थलांतर करताना प्राण गमवावे लागले हा प्रकार टाळता आला असता पण त्यात सरकारला अपयश आले.