सातारा – जावळीतील शशिकांत शिंदे यांच्यापाठोपाठ खटाव प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा धक्कादायक पराभव मानला जात आहे.
येथे एकूण १०३ मतांपैकी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना ५६ तर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदकुमार मोरे यांना ४६ मते मिळाली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीप्रणित सहकार पॅनेलची पहिली उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटावमध्ये येऊन जाहीर केली होती. ‘मी जिल्हा लेव्हलचे काही पाहत नाही. मी फक्त राज्यातच पाहतो,’ असे सांगून अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून नंदकुमार मोरे यांच्या नावाची घोषणा केली होती वास्तविक राष्ट्रवादीचा निर्णय माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि त्यांच्या गटाला रुचला नव्हता. परिणामी घार्गे यांनी कारागृहात असतानाही न्यायालयाची परवानगी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आणि काही झालं तर मी मैदानातच आहे. मैदानातून पळ काढणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देत आपली उमेदवारी कायम ठेवली. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला तरीही ते मागे हटले नाहीत.
माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी कोणत्याही नेत्याचे पाठबळ नसताना स्वतःच्या ताकदीवर राष्ट्रवादीचा पराभव केला आहे. घार्गे यांना 56 इतकी मते मिळाली असून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार नंदकुमार मोरे यांचा 10 मतांनी पराभव केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या हाताने निदान खटाव तालुक्यात का होईना राष्ट्रवादीची माती केली आहे.