NCP News : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या (NCP News) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. तिकिट मिळवण्यासाठी अनेक नेते पक्षश्रेष्ठींची मनधरणी करत होते. मात्र, अनेक बड्या नेत्यांना डावलून फक्त काही निवडक नेत्यांनाच उमेदवारी देण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नाराजीनाट्याचा पहिला मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस (NCP News) पक्षाला बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल ९० प्रमुख पदाधिकारी यांनी एकत्रितपणे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ही घटना राष्ट्रवादीसाठी मोठा झटका मानली जात आहे. नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ९० पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सोपवले आहेत. या सामूहिक राजीनाम्यामागील मुख्य कारण म्हणजे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळणे. NCP News नाझेर काझी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना विधान परिषदेवर जाण्याची इच्छा होती, परंतु यावेळीही त्यांना संधी न मिळाल्याने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सामूहिक राजीनामा दिला आहे. बैठक रद्द या घटनेचा परिणाम म्हणून आज बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP News) पदाधिकाऱ्यांची जी बैठक आयोजित करण्यात आली होती, ती रद्द करण्यात आली आहे. राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीतच आपली नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केल्याचेही समोर आले आहे. पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी मेहनत करत आहोत. यावेळीही आमच्या नेत्याला उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे आम्हाला पक्ष सोडण्याची वेळ आली आहे.” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अद्याप या सामूहिक राजीनाम्याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, पक्षांतर्गत नाराजीचे हे प्रकरण पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.