शिरवळ – खंडाळा तालुक्यातील लक्षवेधी असणाऱ्या शिरवळ ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच लक्ष्मी सागर पानसरे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर सदस्यांनी खंडाळा तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शिरवळ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नोव्हेंबर 2017 रोजी पार पडली. यावेळी आरक्षणानुसार सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षण असल्याने पहिल्या लोकनियुक्त सरपंच म्हणून भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मी सागर पानसरे यांनी बाजी मारली होती तर त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे दिलीप गुंजवटे हे उपसरपंचपदी विराजमान झाले होते. यावेळी गेल्या 30 महिन्यांच्या कालावधीमध्ये सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी मनमानी कारभार सुरु केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सातत्याने होत होता.
यावेळी अचानकपणे दिलीप गुंजवटे यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे सुनील देशमुख यांनी उपसरपंचपदी बाजी मारत सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्या गटाकडे असलेले एक जादा मत घेऊन विराजमान झाले. तरीही लोकनियुक्त सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याविरुद्ध आक्रोश वाढत गेला. त्यांच्या मनमानी कारभाराने नाराज होत विकासकामांना खीळ पडल्याचा आरोप स्वकीयांसह विरोधी सदस्यांकडून होत होते.
या कारभाराला कंटाळून शिरवळ उपसरपंच सुनील देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजवटे, ममता पिसाळ, संगीता निगडे, दत्तात्रय रांगोळे, विकास तांबे, सचिन राऊत, रिजवाना काझी, प्रकाश परखंदे, मंगल क्षीरसागर, आशा कारळे यांच्यासह सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यासोबत सुरवातीपासून किल्ला लढवणाऱ्या शिवसेना शिरवळ शहरप्रमुख विजय गिरे यांच्या पत्नी रुपाली गिरे, ज्योती चव्हाण यांनीही अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने सह्या केल्याने व तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहिल्याने शिरवळमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अविश्वास प्रस्तावावर खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली शिरवळ ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी सोमवारी दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन केले आहे.