मुंबई – अभिनेत्री रिया चक्रवर्तीची आज अमली पदार्थ नियंत्रण विभागाने चौकशी केली. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात आली. रिया चक्रवर्ती हिला आज दुपारी 12 वाजता ‘एनसीबी’च्या बालार्ड इस्टेट येथील कार्यालयात आणण्यात आले. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास पुढे नेण्याच्या उद्देशाने रियाची चौकशी करण्यात येणार असल्याचे “एनसीबी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांचे पथक आज सकाळीच रियाच्या घरी पोहोचले. त्यानंतर तिला चौकशीसाठीचे समन्स बजावण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘एनसीबी’चे सहसंचालक समीर वानखेडे यांच्या अध्यक्षतेखालील पथक सांताक्रूझ येथील रियाच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक पोलीस आणि महिला पोलीसही उपस्थित होत्या. कथित अमली पदार्थांच्या रॅकेट संदर्भात फोन चॅट मिळाल्यानंतर अटक करण्यात आलेल्या शौविक, मिरांडा आणि सावंत यांच्या समोर रियाची चौकशी केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आपण कधीही कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन केलेले नाही. मात्र, सुशांतसिंह राजपूत मारिजुआनाचे सेवन करत असे, असे रियाने काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
‘एनसीबी’ने गेल्या दोन दिवसांत रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा आणि सुशांतचा वैयक्तिक सहायक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. आपण सुशांतसाठी मारिजुआनाच्या गोळ्या खरेदी करत असू, असे सावंत यांनी मिरांडा यांनी चौकशीदरम्यान सांगितले आहे.
सावंत याला शनिवारी अटक करण्यात आली असून त्याला आज स्थानिक न्यायालयापुढे हजर केले गेले. त्याला 9 सप्टेंबरपर्यंत ‘एनसीबी’ची कोठडी देण्यात आली आहे. आतापर्यंत ‘एनसीबी’कडून याप्रकरणी 8 जणांना अटक केली गेली आहे. त्यातील 6 जणांचा सुशांतच्या मृत्यूप्रकरणाशी थेट संबंध आहे. तर अमली पदार्थांच्या प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हेगारी कलमांखाली तपास सुरू झाल्यावर अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ईडी, एनसीबी आणि सीबीआयकडूनही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात आहे.
ही संशयितांची धरपकड – ऍड. सतीश माने-शिंदे
‘रिया अटकेसाठी तयार आहे कारण हे एक ‘विच हंट’ (संशयितांची धरपकड) आहे. जर एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल, तर तिला तिच्या प्रेमाचे परिणाम भोगावे लागतील. निर्दोष असल्याने, तिने बिहार पोलिसांसह सीबीआय, ईडी आणि एनसीबीने दाखल केलेल्या केसमध्ये अटकपूर्व जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतली नाही’ अशी माहिती रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.