कोल्हापूर – मराठा समाजाला नक्षलवाद्यांनी एक पत्र लिहिले होते. दलाल नेत्यांपासून सावध राहा, असे या पत्रात म्हटले होते. आता या पत्राला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना उद्देशून एक पत्र लिहित त्यांनी “नक्षलवाद्यांनी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन केले आहे.
संभाजीराजेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन, मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. “मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असेही नक्षलवाद्यांनी म्हटले आहे.
मात्र मराठा समाजाचा घटक आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने मी नक्षलवाद्यांना आवाहन करतो की त्यांनी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, आम्ही त्यांची वाट पाहात आहोत. भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था लागू केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.
तसेच कुठलीच व्यवस्था परिपूर्ण नसते, तिच्यात उणीवा असणारच. लोकशाहीबाबत पण काहींचे वेगळे मत असू शकतात. परंतु जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. भारताने सुद्धा तिचा यशस्वी स्वीकार केला, यशस्वी वाटचाल सुद्धा करत आलो आहोत. काही उणीवा आजही असतील, पण आपण त्यामध्ये सुधार करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात.
क्रांतीचा विचार हा चांगलाच आहे. पण तो विधायक मार्गाने जाणारा असावा. तो विधायक मार्गाने सुद्धा घेऊन जाता येतो. काही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे, असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मत पेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे, असे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.