हैदराबाद – लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान केल्यास त्याचा लाभ दहशतवादी आणि नक्षलवाद्यांना होईलआणि हे समाजविघातक घटक आणखी मजबूत होतील असा आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केला आहे. कॉंग्रेस पक्ष विकासात अडथळा आणण्याचेच काम करील असेही ते म्हणाले. तसेच तेलंगणा राष्ट्रीय समितीला केलेल्या मतदानातून असदुद्दीन ओवैसीच मजूबत होतील असा दावाही त्यांनी केला.
मोदींना मतदान केल्यास देशात व्यापक विकास होऊन देश समुद्धीच्या मार्गावर जाईल आणि भारत लवकरच महासत्ता बनेल असे ते म्हणाले. त्यांनी कॉंग्रेस आणि तेलंगणा राष्ट्रीय समिती हे पक्ष राष्ट्र विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. कॉंग्रेस प्रणित युपीए सरकारने दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घातली तर मोदी सरकारने त्यांचा सामना बंदुकीच्या गोळीने करण्याचे धाडस दाखवले. यापुढील काळात असे धाडस दाखवणारे सरकारच केंद्रात असायला हवे असे ते म्हणाले.कॉंग्रेस सरकारच्या काळात केवळ सैनिकच नव्हे तर देशातील वैज्ञानिकांचेही हात बांधले गेले होते पण मोदी सरकारने त्यांना पुर्ण मोकळीक दिली म्हणूनच हे दोन घटक देशाची पताका अधिक बुलंद करू शकले आणि जगाला देशाची ताकद दाखवू शकले असेही योगी म्हणाले. देशाच्या शत्रुला चोख प्रत्युत्तर देण्यासाठीच सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटचा एअर स्ट्राईक मोदी सरकारने केले असे ते म्हणाले.