मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. आपल्या घराच्या आसपास काही अज्ञात इसम फिरत असून घरावर पाळत ठेवली जात असल्याचे या ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले होते. त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका करत म्हटले,”गृहमंत्री राष्ट्रवादी पक्षाचेच असताना सोशल मीडियावर ही बाब का समोर आणत आहात, तक्रार करा,” असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावल्यानंतर त्यावर नवाब मलिक यांनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले. नवाब मलिक यांनी शुक्रवारी संध्याकाळी एक ट्वीट केले आहे. यामध्ये एका कारमधील काही लोक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घराच्या आणि शाळेच्या आसपास फिरून रेकी करत असल्याचा दावा केला आहे.
यह लोग इस गाड़ी में सवार पिछले कुछ दिनों से मेरे घर और स्कूल की ‘रेकी’ कर रहे हैं.
अगर कोई इन्हें पहचानता हो तो मुझे जानकारी दे.
जो लोग इस तस्वीर में हैं, मेरा उनसे कहना हैं कि, तुम्हें मेरी कोई जानकारी चाहिए तो आकार मुझसे मिले, मैं सारी जानकारी दे दूँगा pic.twitter.com/ZAmJhqEWoL— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2021
दरम्यान, नवाब मलिक यांच्या या ट्वीटवर अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत प्रतिप्रश्न केला आहे. “नवाब मलिक स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत. राज्याचे गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. मग आपल्या घरावर पाळत ठेवली जाते ही तक्रार ते ट्वीट करून का करतात? की गृहमंत्र्यांवरही विश्वास नाही?” असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.
नवाब मलिक स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत. राज्याचे गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत.
मग आपल्या घरावर पाळत ठेवली जाते ही तक्रार ते ट्विट करून का करतात? की गृहमंत्र्यांवरही विश्वास नाही? https://t.co/JqMaPpzZIV— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 27, 2021
या ट्वीटविषयी विचारणा केली असता नवाब मलिक यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “सोशल मीडियाचा वापर मोदी साहेबांनीच आम्हाला शिकवलाय. या बाबतीत आम्ही त्यांचे शिष्य आहोत. सोशल मीडिया, ट्विटर, फेसबुकचा वापर कसा करायचा, हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो आहोत. विरोधक या बाबतीत इतके तयार झाले आहेत की त्यांना या बाबतीत सोशल मीडियावर चारीमुंड्या चीत केलं जातं. त्याची भिती भाजपाला वाटते. कायदेशीर कारवाई होणारच आहे. पण तुमचं चीलहरण जनतेसमोर होणं गरजेचं आहे. ते आम्ही करतच राहू”, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
“सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवण्याचं काम भाजपानं सुरू केलं होतं. २०१४ मध्ये असत्य पसरवून ते सरकारमध्ये आले आणि ७ वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना भरकटवण्याचं काम त्यांनी केलं. पण ७ वर्षांत विरोधी पक्षाचे कार्यकर्ते त्याच आखाड्याचे पैलवान झाले आहेत. ते इतके तयार झाले आहेत की भाजपाचं असत्य लगेच ते लोकांसमोर आणतात. तुम्हीच नवीन आखाडा तयार केला होता. आता आखाड्यातले पैलवान तुमच्यापेक्षा वरचढ झाले तर तुम्ही म्हणतात आखाड्यात का खेळता?” असा सवाल देखील त्यांनी भाजपाला विचारला आहे.