मुंबई – करोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. यावेळी समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. ते खंडणी वसुली करण्यासाठीच गेले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान, त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? तिथे जाण्या मागचे कारण काय होते?, याचे उत्तर अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
नवाब मलिक म्हणाले, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर एनसीबीमध्ये एक विशेष अधिकारी समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली. हे आत्महत्येचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले, परंतु त्याच्या आत्महत्या किंवा हत्येचे गूढ अद्यापही सुटलेले नाही. पण, त्यानंतर एनसीबीने फिल्म इंडस्ट्रीसोबत गेम खेळण्यास सुरुवात केली, असा दावा मलिक यांनी केला.
बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांना केवळ व्हॉट्सऍप चॅटच्या आधारे एनसीबीसमोर चौकशीसाठी उभे करण्यात आले. यातील ठराविक लोकांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच चौकशीच्या नावाखाली एनसीबीकडून दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झाली, असा थेट आरोपही मलिक यांनी केला आहे.