पुणे – २०१४ लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांनी आतापासूनच तयारी सुरु केल्याचं चित्र सध्या दिसतंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच केलेला मुंबई दौरा त्याचाच भाग असल्याचे सांगतात. बॅनर्जी यांनी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत व पर्यावरण ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जात त्यांची देखील भेट घेतली होती. या गाठीभेटींनंतर राजकीय चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या भेटीत ममता बॅनर्जी व शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली आहे.
2019 च्या निवडणूकीत भाजपने पुलवामा घटनेचा राजकीय फायदा उचलला
पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना मलिक यांनी, “पुलवामात मोठ्या प्रमाणात आरडीएक्स कुठून आलं याचा तपास अजून लागला नाही. यासारख्या घटनांचा फायदा घेऊनच भाजप सत्तेवर आला आहे. भाजपची देशात सात वर्षापासून सत्ता असताना दहशतवाद अजूनही संपला नाही, चीन सारखे देश या देशात नवीन गाव उभ करतात. 2019 च्या निवडणूकीत भाजपने पुलवामा घटनेचा राजकीय फायदा उचलला. त्याच्या आधारावरच त्यांच्या सर्व जागा निवडून आल्या.” असा गंभीर आरोप केला.
जास्तीत जास्त लोकं भाजपवर नाराज
“आजच्या परिस्थितीत जास्तीत जास्त लोकं भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे 2024 ला या देशात मोदी सरकार राहणार नाही हे स्पष्ट आहे. कृषी कायदे रद्द झाल्यानंतर सरकार देशासमोर झुकते हे समोर आल आहे. देशात परिवर्तन अटळ आहे.” असा दावा देखील त्यांनी केला.
ममतादीदींसोबत त्याच विषयावर चर्चा झाली
देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावं, एनडीएमध्ये कोणीही शिल्लक राहत नाही, एनडीए सोडून लोक जात आहेत. आजच्या घडीला भाजप विरोधात देशात वातावरण निर्माण झाले आहे. देशातल्या सर्व विरोधकांची मोट बांधण्याचे काम पवारांनी घेतले आहे. ममतादीदींसोबत त्याच विषयावर चर्चा झाली. देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन मोठी आघाडी निर्माण करून देशाच्या जनतेला पर्याय उपलब्ध करून देणार आहोत. त्याची चिंता भाजपला सतावत आहे.