नवी दिल्ली -गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने लष्कराबरोबरच नौदल आणि हवाई दलासाठी हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे तब्बल 3 हजार 500 किलोमीटरवर पसरलेल्या चीनलगतच्या सीमेवरील भारतीय तळ पूर्णपणे सज्ज राहणार असल्याचे सूचित झाले आहे.
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विविध उच्चस्तरीय बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये तिन्ही दलांसाठी आणखी सतर्कतेचे आदेश जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत विशेषत: पूर्व लडाखमध्ये मागील काही दिवसांपासून भारत आणि चीनी लष्करांमध्ये तणावाची स्थिती होती. तेव्हापासूनच भारतीय सशस्त्र दले सतर्कता आणि सज्जता बाळगून होती. आता गलवान खोऱ्यातील चीनी आगळिकीनंतर सशस्त्र दलांसाठीची अलर्ट पातळी आणखी उंचावण्यात आली आहे. लडाखबरोबरच एलएसीलगत असणाऱ्या अरूणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील तळांवर आणि सीमानाक्यांवर लष्कराने अतिरिक्त जवान धाडले आहेत.
एलएसीवर बारीक नजर ठेवत सज्ज असलेल्या हवाई दलानेही लढाऊ विमानांची तैनाती वाढवली आहे. हिंद महासागर विभागात चीनी नौदलाचा वावर वाढल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्या विभागात भारतीय नौदलानेही आपली ताकद वाढवली आहे. त्यासाठी युद्धनौकांच्या तैनातीवर भर देण्यात आला आहे. त्याशिवाय, भारतीय लष्कराने सर्व जवानांच्या सुट्याही रद्द केल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी आणि संकेतस्थळांनी दिले आहे.