कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात आज पारंपारिक पद्धतीने तोफांची सलामी देऊन भक्तीमय वातावरणात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. आज पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
करोना साथीमुळे दोन वर्षांनंतर हा सण साजरा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत सुमारे 25 लाख भाविक महालक्ष्मी मंदिराला भेट देतील, अशी मंदिर समितीला अपेक्षा आहे.
पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची आज सिंहासनारूढ या रूपात पूजा बांधण्यात आली. अंबाबाई सिंहासनावर विराजमान होऊन भक्तांना दर्शन देत आहे अशा स्वरूपाची पूजा आहे. दरम्यान देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसर भाविकांनी फुलला आहे.