घटस्थापना विशेष : अरुण गोखले
श्री आदिशक्तीची उपासना ही आपल्याकडे फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. देवी उपासनेच्या या नऊ दिवसांत घरोघरी मांडला जाणारा घट, दीप, माळ आणि फुलोरा या गोष्टी आपण करीत आलो आहोत. कोणतीही उपासना करताना ती त्या मागचे तंत्र मंत्र आणि यंत्र ह्यांचा नीट विचार करून केली तर त्याचे महत्त्व हे अधिक असते, अशा डोळस उपासनेने आपली श्रद्धा, भक्त आणि निष्ठा ही बळावत असते.
आपल्या ऋषी, मुनी, सिद्धसाधक आणि उपासकांनी नवरात्र उपासनेची पद्धत, यंत्र आणि उपासनेतला सिद्ध मंत्र कोणता हे ठरवीत असताना या शक्ती उपासनेचा आणि मानवी जीवनाचा काय परस्परसंबंध आहे? ही उपासना जीवाचे कसे कल्याण करणारी ह्याचा फार बारकाईने अभ्यास केलेला आहे.
श्रीमहाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ह्या आपल्याकडील तीन प्रमुख देवता. देवी पुराणातील दाखल्याप्रमाणे या तीन देवतांनीच वेगवेगळे अवतार घेऊन या विश्वाचा कारभार चालविला आहे, त्यांचे जसे ह्या ब्रह्मांडात कार्य चालते तसेच ते आपल्या पिंडात म्हणजेच शरीरात अर्थात आपल्या जीवनात.
आपल्या ऋषी मुनींनी आणि नाथसिद्धांनी ही नवरात्राची उपासना जीवाचे कल्याण करणारी व्हावी. त्याचा प्रपंच आणि परमार्थ हा सार्थ व्हावा ह्या उदात्त हेतूने त्यासाठी यंत्र, तंत्र आणि मंत्र ह्या तीन गोष्टींची एक सुरेख अशी सांगड घातली आहे.
घटस्थापना आणि विशिष्ट पद्धतीने करायची उपासना लक्षात घेऊन लोकांनी ती उपासना करावी या उदात्त हेतूनेच ही पारंपरिक नवरात्र-उपासना समाजारूढ केलेली आहे.