मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्या हनुमान चालीसा पठाणावरून राज्यात काही महिन्यापूर्वी चांगलाच गोंधळ निर्माण झाले होते. आता राणा यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी त्यांनी, “जिथे जिथे प्रभू रामचंद्र आणि हनुमंताला विरोध केला जाईल तिथे मी डोक्याला कफन आणि भगवा बांधून उभी राहिन” असे म्हटले आहे. नवनीत राणा यांनी अमरावतीत हजारो महिलांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा पठण केलं. त्यावेळीच त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
अमरावतीत हा कार्यक्रम सुरू असताना नवनीत राणा म्हणाल्या की, “जय श्रीराम चा नारा इतका मोठ्याने द्या की प्रभू रामचंद्रांचा विरोध करणाऱ्या प्रत्येकापर्यंत हा आवाज पोहचला पाहिजे. कुणीही विरोध केला तरीही आमचा आवाज कधीही कमी होणार नाही. महिलांना कुणी शांत करू शकत नाही. अनादीकाळापासून महिला लढणारी आहे. महिला लढत राहणार आहे” से असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना “या देशाची संस्कृती आम्ही पाळतोच आहोत. मात्र जय श्रीरामचा नारा आम्ही देणारच” असेही नवनीत राणा म्हणाल्या. हक्काने लढणं हे आम्हाला आमच्या देशाने शिकवलं आहे. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणार. फक्त एवढी घोषणा केल्यावर जर १४ दिवस मला तुरुंगात टाकलं होतं. तेव्हाच मी ठरवलं होतं की जिथे जिथे हनुमंताला आणि प्रभू रामचंद्राला विरोध झाला तर मी सहन करणार नाही.धर्माच्या विरोधात कुणीही उभं राहिलं तर त्यांच्या विरोधात सर्वात आधी मी उभी राहणार आहे.
महाराष्ट्राला सुखी ठेवण्यासाठी आपण हनुमान चालीसा पठण करणार होतो. ते आपण करून दाखवलं. कारण राज्यात आता हिंदू विचारांना मानणारं शिंदे-फडणवीस सरकार आलं आहे. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत उभे राहू यात माझ्या मनात काहीही शंका नाही असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. अमरावतीची खासदार आणि देशाची नागरिक म्हणून मला या ठिकाणी विकास करायचा आहे. मला सगळ्यांनी अमरावतीची सून म्हणून पाहिलं आहे. पण लढा देणारी महिला म्हणून तुम्ही मला वर्षभरापासून पाहात आहात असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.