नवी दिल्ली – लोकसभेत सध्या शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात चर्चीले जात आहे. मात्र अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत शेतकरी आंदोलनापेक्षा महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. त्यांच्या संपूर्ण संभाषणात ठाकरे सरकार रडारवर पाहायला मिळाले. त्यांनी ठाकरे सरकार स्थिगीती सरकार म्हटले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कोणत्याही कामाला स्थगिती देण्याचा पायंडा पाडला आहे. केंद्र सरकारकडून काही योजना आल्या किंवा विरोधी पक्षाकडून काही काम आले की त्याला स्थगिती देण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे. करोना काळात केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून भरपूर साहित्य दिलं. मात्र ठाकरे सरकारने पीएम केअर फंडलाच विरोध केल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र सरकारने करोना काळातील अपयश लपविण्यासाठी मृत्यू दर लपविल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला.
नवनीत राणा म्हणाल्या की, आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना राज्यात आणल्या. त्यांनी ज्या-ज्या योजना आणल्या त्या योजनांना ठाकरे सरकारने स्थिगीती दिली. यामध्ये मुंबई मेट्रो, आरे कारशेड, बुलेट ट्रेन, ग्रामसडक योजना, मराठवाडा वॉटर ग्रीड, सीएम फेलोशिप, मुंबई-पुणे हायपूरल यासह अनेक कल्याणकारी योजनांचा समावेश असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला.
महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हुकूमशाही करत आहेत. शेतकरी प्रश्नी आम्ही आवाज उठवला, त्यावेळी त्यांनी आमदार रवी राणा यांना अटक केल्याचे राणा यांनी सांगितले. तसेच ठाकरे सरकारने आम्हाला मुंबईपर्यंत पोहचू दिल नसल्याचे राणा यांनी सांगितले.