नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२१ – २०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे आजच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटवर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अपक्ष खासदार नवनीत कौर राणा मोदी सरकारच्या यंदाच्या बजेटवर खूश आहेत. अपेक्षेपेक्षा उत्तम बजेट असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
करोनामुळे देशाची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासाळली आहे. अशा परिस्थितीत देखील एवढं चांगलं बजेट देणे अपेक्षेपेक्षा जास्त आहे. शेतीसाठी अनेक योजना दिल्या आहेत. शेतीच्या एकूण खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची योजना महत्त्वपूर्ण आहे. आदिवासी भागासाठी देखील अनेक योजना सरकारने दिल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले.
पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ राज्यांना केंद्राने प्रोत्साहन दिले आहे. महाराष्ट्रातील नागपूर आणि नाशिक येथील मेट्रो लाईनसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. करधारकांना दिलासा देण्यात आल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. एकूणच केंद्र सरकारच्या बजेटवर नवनीत राणा खूश दिसून आल्या.