अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद मध्ये मोठी सभा झाली. मात्र या सभेवरून अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणेबाजी केली आहे. ‘लबाड लांडगा ढोंग करतोय निर्णय घ्यायचं म्हटलं की सोंग करतोय.’ अशा शब्दात टीका करीत शून्य निर्णयक्षमता असलेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले जाईल. असेही त्यांनी म्हंटले. औरंगाबादच्या सभेवरून विविध मुद्दे धरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना ‘लबाड सेना’ बनलीय
औजारंगाबादच्या सभेवरून राणा म्हणाल्या , उद्धव ठाकरेंच्या सभेतून जनतेला काय मिळालं तर भोपळा. आज वाटले होते ठाकरे संभाजीनगरचा पाणी प्रश्न मिटवतील पण त्यावर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. नंतर वाटलं औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करतील पण त्यावरही निर्णय घेतला नाही. सरदारच लबाड असल्यामुळे शिवसेना ‘लबाड सेना’ बनलीय. अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
तुमचं पाप गंगेत न्हाहूनही धुतलं जाणार नाही
पुढे त्यांनी हनुमान चालिसा प्रकरणावरूनही मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे. त्या म्हणाल्या, हनुमान चालिसा पठण केल्यामुळे आमच्यावर राजद्रोहा सारखा गुन्हा दाखल केला. हा कलंक दूर करण्यासाठी दुग्धाभिषेक आम्ही केलाय. पण तुमच्या पापाचा घडा भरत आलाय. तुम्ही केलेलं पाप गंगेत न्हाहूनही धुतलं जाणार नाही एवढं लक्षात ठेवा. ठाकरे सरकारनं शेतक-यांची चेष्टा चालवलीय. बांधावर जाऊन शेतक-यांच्या समस्या ऐकण्याचं आश्वासन देणा-या उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे घराबाहेर न पडण्याचा वर्ल्ड रेकॅार्ड तेवढा केलाय… शेतक-यांच्या अश्रूंचा बांध फुटला तरी उद्धव ठाकरेंच्या संवेदना जागा झाल्या नाहीत.
संभाजीनगर नामकरण करण्याची इच्छा ठाकरेंची नाहीच
राज्यात गाजलेल्या औरंगजेब कबरीवरूनही त्यांनी सवाल केला त्या म्हणाल्या , उद्धव ठाकरेंना औरंगजेबचा एवढा पुळका का आहे? अन् औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणा-यावर औवेसीवर ठाकरे सरकार मेहरबान का आहे ? संभाजीनगर नामकरण करण्याची इच्छा ठाकरेंची नाहीच शिवाय औवेसींना अटक करण्याची हिम्मतही उद्धव ठाकरेंमध्ये नाही. महागाई वरून गरळ ओकणा-या ठाकरे सरकारनं जनतेची चेष्टा केलीय. डिझेल आणि पेट्रोलवरचा कर कमी करण्यास सरकार तयार नाही. असे त्या म्हणाल्या.