पुणे- कंगणा रानावत प्रमाणे सहह्दयता आणि आस्था दाखवून आपल्यावरील अन्याय दुर करावा अशी मागणी चित्रपट निर्माते निलेश नवलाखा यांनी राज्यपालांना केली आहे. यासाठी त्यांनी राज्यपालांना एक पत्र पाठवून भेटण्याची वेळ मागितली आहे.
नवलाखा यांनी दहा चित्रपटांची निर्मीती केली असून त्यांच्या तीन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तर अनेक चित्रपटांना आंतराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. नवलाखा यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, कंगणा रानावत यांच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईत आपण वैयक्तीक लक्ष घालून तीची भेट घेतली. महत्वाच्या अधिकाऱ्यांकडून आपण याची माहिती घेतली. मला आपल्यातील सहह्दयता आणी चित्रपटसृष्टीबद्दल असलेली आस्था बघून आनंद झाला आहे. मी मराठी चित्रपट निर्माता तसेच छोटासा बांधकाम व्यवसायीकही आहे.
माझ्या प्रकल्पासमोर अनेक बेकायदा बांधकामे मागील चार ते पाच वर्षात झाली आहेत. मी अनेकदा तक्रारी करुन देखील महापालिकेने काहीच कारवाई केली नाही. माझ्यासारख्या कायदेशीर व्यवसाय असणाऱ्याला आज कोणीही मदत करत नाही. माझी खात्री आहे की, आपण मुंबई महापालिकेच्या कारभाराकडे लक्ष देत आहात, तसेच पुणे महापालिकेच्या कारभारात देखील लक्ष घालाला. जशी आपण कंगणा रानावतला भेटण्याची संधी व म्हणणे मांडण्याची संधी दिली तशी संधी मला सुध्दा मिळावी.