राहुल गांधींकडे सोपवले पत्र
चंडीगढ -पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी संघर्ष करण्याच्या मुडमध्ये असलेले त्या राज्याचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी दिल्ली दरबारी धाव घेतली. कॉंग्रेस श्रेष्ठींची भेट घेऊन त्यांनी त्यांचे गाऱ्हाणे मांडल्याचे समजते.
सिद्धू यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. सिद्धू यांनी पंजाबमधील स्थितीची माहिती देणारे एक पत्र राहुल यांच्याकडे सोपवले. ते पत्र लेटरबॉम्ब ठरणार की अमरिंदर आणि सिद्धू यांच्यात तह घडवणार ते आगामी काळात स्पष्ट होईल. अमरिंदर आणि सिद्धू यांच्यात काही काळापासून मतभेद सुरू आहेत.
तशातच पंजाबमध्ये सत्तेवर असूनही कॉंग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्याचा ठपका स्वत: अमरिंदर यांनी सिद्धू यांच्यावर ठेवला. शहरी विकासाशी संबंधित स्थानिक प्रशासन खाते सिद्धू यांच्याकडे होते. मात्र, सिद्धू यांनी ते खाते योग्यरित्या न सांभाळल्याने पंजाबच्या शहरी भागांत निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी चांगली झाली नाही, अशी भूमिका अमरिंदर यांनी मांडली.
त्यानंतर अलिकडेच अमरिंदर यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करताना अनेक मंत्र्यांचे खाते बदलले. त्याला सिद्धूही अपवाद ठरले नाहीत. सिद्धू यांच्याकडील महत्वाचे स्थानिक प्रशासन खाते काढून घेऊन त्यांच्यावर ऊर्जा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे अमरिंदर आणि सिद्धू यांच्यातील संघर्ष सुरूच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सिद्धू यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेण्याचे महत्व वाढले आहे.