सुनीता शिंदे
कराड – कराड पालिकेत गेल्या काही महिन्यांपासून उपनगराध्यक्षपदावरून अंतर्गत राजकारण सुरू आहे. विद्यमान उपनगराध्यक्ष जयवंत पाटील हे खांदेपालट करायला तयार नसल्याने त्यांना अनेक कार्यक्रमांमधून डावलले जात आहे. त्यांच्या जागी इतर नगरसेवकांनी आपल्या हातात पालिकेची सूत्रे घेतली असून ते कारभारी बनले आहेत. एवढेच नव्हे तर नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या महत्त्वाच्या समितीतूनही पाटील यांना डावलण्यात आल्याने “उपाध्यक्ष राहिले नावाला’ असे म्हणायची वेळ आली आहे.
कराड पालिकेत अरुण जाधव यांची जनशक्ती आघाडी, राजेंद्रसिंह यादव यांची यशवंत विकास आघाडी व जयवंत पाटील यांची लोकसेवा आघाडी यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. या तिन्ही आघाड्यांचे मिळून सोळा नगरसेवक असून त्यांना अपक्ष नगरसेवक कश्मिरा इंगवले यांचा पाठिंबा आहे. सत्ताधाऱ्यांमधून उपनगराध्यक्षपदी जयवंत पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. ते गेली तीन-साडेतीन वर्षे या पदावर ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्या जागी इतरांना संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे.
मात्र, ते खांदेपालट करायला तयार नाहीत. त्यांची कार्यपद्धतीही फारशी कोणाला रुचली नसल्याने राजेंद्रसिंह यादव समर्थक दहा नगरसेवकांनी जयवंत पाटील यांच्यापासून फारकत घ्यायला सुरुवात केली आहे. लोकसेवा आघाडीत जयवंत पाटील यांच्यासह चार नगरसेवक आहेत. त्यांना कश्मिरा इंगवले यांनी पाठिंबा दिला आहे. हे नगरसेवक वगळता इतर कोणी सध्या त्यांच्यासोबत नाहीत. याउलट या पदासाठी इच्छुक असलेल्या इतर नगरसेवकांचे बळ वाढत असून त्यांच्या इशाऱ्यावर सध्या पालिकेचे राजकारण सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच पालिकेतील अंतर्गत कलहाची ठिणगी पडली होती; परंतु त्याची बाहेर चर्चा झाली नव्हती. नगरसेवकांनी जयवंत पाटील यांच्यापासून घेतलेली फारकत विधानसभा निवडणुकी दरम्यान नागरिकांसमोर आली. त्यावेळी जयवंत पाटील यांनी डॉ. अतुल भोसले यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्यासोबतच्या नगरसेवकांनी भूमिका लगेचच स्पष्ट केली नव्हती.
पुढे उदयनराजे भोसले यांच्यामळे त्यांनाही भाजपचे काम करावे लागले असले तरी हे दोन्ही गट एकत्र काम करताना दिसले नाहीत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पालिकेच्या काही महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले. त्यावेळी भाजपच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत राजेंद्रसिंह यादव व त्यांचा गट होता. मात्र, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील नव्हते. त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते की, निमंत्रण असूनही ते कार्यक्रमांना गेले नाहीत, यावरून नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.
गेल्या आठवड्यात पालिकेच्या विशेष सभेत जयवंत पाटील यांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याकडे आपल्यासह पाच नगरसेवकांची वेगळी बैठकव्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यावरून राजेंद्रसिंह यादव व जयवंत पाटील यांच्या आघाड्यांमध्ये पडलेली फूट प्रत्यक्षात दिसली. पालिकेच्या कोणत्याही कार्यक्रमात उपनगराध्यक्षांना सामावून घेतले जात नाही आणि महत्त्वाच्या समितीतूनही त्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे ते आता नावापुरतेच पदावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सब गोलमाल है!
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत आघाडी घेतलेल्या पालिकेत राजकारणाचा गोलमाल आहे. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांना भाजपच्या सदस्यांचा पाठिंबा नसल्याने त्याही एकाकी पडल्या आहेत तर सत्ताधाऱ्यांमधील उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्यापासूनही नगरसेवकांनी फारकत घेतली आहे. त्यामुळे त्यांचे सध्या “एकला चालो रे’ सुरू आहे.
जैवविविधता समितीत समावेश नाही
नगरविकास विभागाच्या पत्रानुसार पालिकेत 15 सदस्यांची जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये आठ जण कार्यकारी मंडळावर तर सात जण निमंत्रित सदस्य आहेत. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्ष आणि राजेंद्रसिंह यादव, स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, विनायक पावसकर, सौरभ पाटील, विजय वाटेगावकर हे सदस्य आहेत. या समितीतून जयवंत पाटील यांना वगळण्यात आले आहे.