सुगंधित तेलाने मसाज….ऍरोमाथेरपि
ऍरोमाथेरपिस्ट म्हणजे एक सुगंधित क्षेत्र. ऍरोमाथेरपी हे ऍरोमॅटिक वनस्पतीच्या तेलाद्वारे आरोग्याचं व सौंदर्याचं जतन करणारं गुणकारी शास्त्र आहे. मुलायम केस व निरोगी त्वचेबरोबरच शरीर, मन आणि भावनांवरसुद्धा यांचा चांगला परिणाम होतो. फुलं, औषधी वनस्पती, लाकूड, मसाल्याचे पदार्थ यांपासून तेलाचा अर्क काढतात.
सुगंधी तेल व अर्कतेल यात खूप फरक आहे. पहिल्यात अनैसर्गिक रसायनं असतात व अर्कयुक्त तेलाप्रमाणे त्यांच्या उपचाराचा प्रभाव शरीरावर पडत नाही.
या अर्कयुक्त तेलाचा सुवास हुंगला असता आपल्या संपूर्ण शरीरात व मनात चांगलाच परिणाम साधला जातो. त्यामुळे सकारात्मक विचार करण्यास मेंदू तरबेज होतो. या तेलाच्या विविध रीतीने वापर करण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धती आहेत.
निसर्ग घटकांचा आयुर्वेदाच्या आधारने वापर करून मानवी शरीर व मन निरोगी, प्रफुल्लित राखता येतं. स्वत: अभ्यास करून ऍरोमाथेरपिचं ज्ञान मिळवता येतं. ऍरोमाथेरपीवर अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यामुळे वाचनाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष अनुभवातून ही थेरपी शिकता येते.
सौंदर्यप्रसाधनात तेलाला फार महत्व आहे. प्राचीन शिल्पांतूनही आपल्या सौंदर्याची काळजी घेणाऱ्या स्त्रिया बघायला मिळतात. निसर्गाच्या पोटात सौंदर्यवेधक अशा अनेक वस्तू दडलेल्या आहेत.
लग्नाच्या वेळी नववधू आणि वराच्या शरीराला हळद व तेल यांचा लेप देण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. शिवाय तेलात डाळीचं पीठ वा कणिक मिसळून त्याचं उटणंही लावलं जातं. सर्वसाधारणपणे सगळी कामं आटोपल्यानंतर स्त्रिया रात्री तेलात इतर पदार्थ मिसळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावतात.
एखाद्या विशेष घटनेसाठी, समारंभासाठी म्हणून नाही, तर अनेक जणींचा तो दैनंदिन कार्यक्रम असतो. अशा प्रसाधनांमध्ये तेल हा अत्यावश्यक घटक असतो. याचाच अर्थ नैसर्गितक सौंदर्यप्रसाधनांसाठी तेल हा महत्त्वपूर्ण घटक आहे. हिवाळ्यात थंडीमुळे शरीरातील रक्ताभिसरण नीट होत नाही. त्या वेळी त्वचा कोरडी दिसू लागते. तो कोरडेपणा नष्ट करून त्वचा मुलायम करण्यासाठी तेलाची गरज असते.
हळद आणि तेल हळद आणि तेलाच्या उटण्याचा त्वचेसाठी कितीतरी फायदा होतो. मुळात हळद हीच औषधी आहे. त्वचेच्या रोगांवर उपचारासाठी हळद अतिशय उपयुक्त असते. पण हळदीचा सर्वात मोठा गुण म्हणजे हळदीमुळे त्वचा उजळते. हळदीमुळे कांती रसरशीत होते. म्हणूनच लग्नाआधी नववधूच्या अंगाला हळद लावतात. ही पध्दत पूर्वापार चालत आली आहे. उटण्यामध्ये मोहरीचं किंवा खोबरेल तेल वापरतात. अनेक स्त्रिया डाळीचं पीठ (बेसन) वा गव्हाची कणिकही त्यात वापरतात. मूल जन्मल्यानंतर त्याला हे उटणं लावलं जातं. विशेषत: मुलींच्या चेहऱ्याला व शरीराला हे उटणं लावतात.
जेणेकरून शरीरावर अनावश्यक केस उगवत नाहीत. ज्या स्त्रिया नियमितपणे या कारणासाठी असं उटणं वापरतात त्यांना बाजारातील हेअर रिमूव्हर घेण्याची गरज भासत नाही. खेड्यांमधील बायका अजूनही या कारणासाठी उटणं वा राख याचाच वापर करतात.
बाजारात मिळणारी सौंदर्यप्रसाधनं फारशी परिणामकारक नसतात. उलट, नैसर्गिक तेलाच्या वापरामुळे त्वचेला आवश्यक तो खुराक मिळतो. आठवड्यातून एकदा तरी तेलाचा वापर केला तरी तो पुरेसा असतो. मात्र, बाजारातील सौंदर्यप्रसाधनांचा वापर रोज आणि कधी कधी तर दिवसातून एकापेक्षा अधिक वेळा करावा लागतो. यात वेळ तसंच पैसा तर खर्च होतोच शिवाय त्वचेचं नुकसानही होतं.
वेगवेगळी प्रसाधनं वारंवार वापरल्यामुळे त्वचेवर डाग पडतात. प्रसाधनं काही काळच टिकतात. त्यानंतर चेहरा अतिशय खराब, विचित्र दिसू लागतो. त्यामुळेच बाजारातील प्रसाधनांचा वापर फार काळजीपूर्वक केला पाहिजे.
ऑलिव्ह तेल
नैसर्गिक तेलांमध्ये ऑलिव्ह तेल सर्वोत्कृष्ट समजतात. या एकाच तेलाचा वापर केला तरीही कांती अशिय उजळ व मुलायम होते. चेहऱ्याची स्निग्धता रोज दुपटीने वाढते. संपूर्ण शरीराला हे तेल नियमित लावलं तर कोणत्याही ऋतूत शरीर कोरडं होत नाही. संपूर्ण शरीराला या तेलाने झोपण्यापूर्वी किंवा आंघोळीच्या एक तास अगोदर मालिश दुपटीने वाढते. संपूर्ण शरीराला हे तेल नियमित लावले तर कोणत्याही ऋतूत शरीर कोरडं होत नाही.
संपूर्ण शरीराला या तेलाने झोपण्यापूर्वी किंवा आंघोळीच्या एक तास अगोदर मालीश करा आणि आंघोळ सकाळी लवकर करा. गरम पाण्याने आंघोळ केली तर साबणाची गरज भासत नाही. आंघोळीनंतर जाड टॉवेलने शरीर घासून पुसा. काही दिवसांतच तुम्ही आणि तुमचे हेफ देखील किती खुश होतात ते पहा.
इतरही अनेक नैसर्गिक तेलं आहेत. उदाहरणार्थ, मोहरी, नारळ (खोबरेल), बदाम, चमेली, एरंड, तीळ, चंदन इत्यादींपासून बनवलेली तेलं. चंदनाचं तेल बोटाने चेहरा व गालांवर खालून वर दिशेने लावा. डोळ्यांखाली कोरडेपणा राहात नाही. चेहरा सिग्ध, मऊ राहातो.
बऱ्याचजणांच्या टाचेला भेगा पडतात. त्यात जर साडी वा कपड्याचा थोडासाही भाग अडकला तर वेदनेने कळवळायला होतं. पाय जमिनीवर टेकवत नाही, टाचेवर किंचितही दाब पडला तरी खूप दुखतं. विशेषत: हिवाळ्यात हा त्रास अधिक प्रमाणात होतो.
अशा वेळी तेल हा रामबाण उपाय आहे. झोपताना मोहरीचं तेल गरम करून कापसाने टाचेला लावलं तर त्वरित बरं वाटतं. ओठ फाटतात तेव्हाही रात्री झोपताना या तेलाचा एक थेंब बेंबीवर लावला तर दुसऱ्या दिवशी ओठ पूर्ववत होतात.
डोकेदुखीने हैराण झालेल्या स्त्रियांनी रोज मोहरी वा खोबरेल वा खोबरेल तेलाने मालीश केलं तर डोकेदुखी पळून जाते. शिवाय याच्या नियमित वापरामुळे केस गळणं थांबून केस लांब, दाट, चमकदार व मऊ होतात.
अनेक जणींना रात्री झोपताना पायदुखीचा त्रास होतो. घरी व बाहेर कामं करून या स्त्रिया थकतात. नोकरदार स्त्रियांना दुहेरी जबाबदारीमुळे हा त्रास अधिक होतो. अशा स्त्रियांनी मोहरीचं तेल गरम करून त्याने रोज पोटऱ्यांना हळूवारपणे मालीश करायला हवं. हे मालीश हळुवारपणे व स्वत:लाच करता येतं थकवा आणि पायपिटीमुळे टाचांनाही या गरम तेलाने किंवा तुपाने मालीश केलं तर खूप लाभ होतो.
मुलतानी माती व तेल लेप
सौंदर्यप्रसाधनांसाठी तेलाबरोबरच मुलतानी मातीही वापरणं किफायतशीर असतं. मुलतानी मातीबरोबर मोहरी किंवा ऑलिव्ह तेल वापरता येतं. मुलतानी माती थोड्याशा पाण्यात भिजवा. त्यामुळे मातीची पेस्ट तयार होईल. त्यात गरजेप्रमाणे तेल मिसळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावा. जर रात्री लेप लावला तर सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा. दिवसाही घरकाम आटोपून लेप लावता येईल. तसं केल्यास तासाभराने कोमट पाण्याने चेहरा धुवा.
मोहरीच्या तेलात हळद मिसळून उटणं बनवता येतं. त्याचा वापर चेहरा तसंच संपूर्ण शरीरासाठी करता येतो. हे करताना एकच काळजी घ्यायला हवी ती म्हणजे उटणे लावताना जुने आणि रोजच्या वापरात नसलेले कपडे घालावेत. या उटण्याचा वापर आठवड्यातून किंवा महिन्यातून एक – दोन वेळा केला तरीही पुरेसा आहे.
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाचं तेल सर्वात उत्तम आहे. बदामाच्या तेलात थोडीशी मुलतानी माती मिसळली तर सर्वोत्कृष्ट सौंदर्यप्रसाधन तयार होतं. चेहऱ्यावरील डाग घालवून चेहरा उजळ होण्यासाठी हे उत्तम प्रसाधन आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी एरंडाच्या तेलात थोडासा लिंबाचा रस मिसळून वापर केला तरीही थोड्याच दिवसांत सुरकुत्या नाहीशा होतात.
या वेगवेगळ्या नैसर्गिक तेलांचाच वापर चेहरा किंवा शरीरावर केला तर तुम्हाला इतर कोणत्याही सौंदर्यप्रसाधनांच्या वापराची गरज भासणार नाही. कारण तेल हे त्वचेसाठी खुराक तर आहेच शिवाय त्वचेला उजळविणारं उत्तम साधनही आहे.
सौंदर्य आणि नैसर्गिक तेल हे परस्परपूरक असे पर्याय आहेत. तेलामुळे सौंदर्य वाढतं, टिकतं तसंच अनेक आजारही बरे होतात. सौंदर्यप्रसाधनांपासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून नैसर्गिक तेलामुळे जसा बचाव होतो तसाच पैशांचा अनावश्यक खर्चही टळतो. आपण काही आयुर्वेदिक तेले पाहूया…
शरीरातील अंतर्बाहय रूक्षता घालविण्याकरिता; केसांच्या आरोग्याकरिता ; जखम स्वच्छ करून, भरून आणण्याकरिता; सूज, मार. मुरगळा बरा करण्याकरिता; नको असलेले केस काढण्याकरिता; विविध तेलांचा विविधप्रकारे उपयोग करता येतो.
तेल, ज्या पदार्थापासून, बियांपासून निघते त्याचे गुण त्या तेलांत असतातच त्याशिवाय तेलाचे वातावरील प्रमुख औषध म्हणून स्वतंत्र गुण आहेतच. याशिवाय या तेलाबरोबरच्या इतर घटकद्रव्यांबरोबरचे गुणही सिध्द तेलामध्ये मिळतात. यामुळेच केवळ ऐंशी प्रकाराच्या वाताविकारांकरिताच नव्हे तर सर्व तऱ्हेच्या रुग्णांना तेल हे एक वरदान आहे.
– सुजाता टिकेकर