लोणावळा (वार्ताहर) – पर्यटकांचा आणि ट्रेकर्सचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या राजमाची गावात तीन दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग या चक्रीवादळाने हाहाकार उडवून दिला आहे. या गावचे चित्रच निसर्गने बदलून टाकले आहे. येथील अनेक आदिवासी कुटुंबाचे संसार उघड्यावर आले तर अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच शेकडोंच्या संख्येने मोठमोठी झाडे जमिनीवर मोडून पडली.
राजमाची उढेवादी हे आदिवासी गाव लोणावळा शहरापासून 16 किलोमीटर दूर जंगलात वसलेले आहे. या ठिकाणी राजमाची, उढेवादी, वन्हाटी आणि फणसराई आशा चार वस्त्या आहेत. या चारही वस्त्यांवर सुमारे 60 ते 65 आदिवासी कुटुंबातून 250 लोक राहतात. वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे आजवर रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत गरजांपासून दूर राहिलेल्या या गावांना आजवर ज्या निसर्गाने साथ दिली, त्याच निसर्गाचे नाव धारण करून आलेल्या चक्रीवादळाने येथील गावकऱ्यांचे संसार होत्याचे नव्हते करून टाकले.
निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात सर्वाधिक तडाखा हा राजमाची गावाला बसला.
राजमाची गावातील 4 घरे जवळपास जमीनदोस्त झाली आहेत. 3 घरांसह जिल्हा परिषद शाळेची इमारत तसेच एका स्थानिक संस्थेच्या इमारतीच्या छापराचे 80 ते 100 टक्के पत्रे फुटले किंवा उडून गेले आहेत. याशिवाय 18 ते 20 घरांच्या पत्र्यांचे 20 ते 50 टक्के नुकसान झाले आहे. वन्हाटी गावातील 4 ते 5 घर जमीनदोस्त झाली असून, 10 ते 12 घरांचे 20 ते 50 टक्के नुकसान झाले आहे. फणसराई येथील 4 झोपड्या वजा घरे वाऱ्यासोबत उडून गेली तर उर्वरित चार झोपड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोबतच बहुतेक सर्व घरांमधील धान्य, कपडेलत्ते, अंथरुणपांघरूण पाण्यात भिजून खराब झाले आहेत.
सदर नुकसानीची खबर मिळताच गुरुवारी 4 जून रोजी आमदार सुनील शेळके, प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, मंडल अधिकारी ज्ञानेश्वर कारकर, तलाठी संदेश शिर्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच तात्काळ मदत पोचविण्याचे आश्वासन दिले. पावसात गावाकडे जाणारे रस्ते वाहून जात असल्याने मॉन्सून सुरू होण्यापूर्वी या गावांमधून मदत तसेच छापरासाठी आवश्यक पत्रे पोचणे अत्यंत गरजेचे असल्याने आता राजमाची किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी येणारे अनेक ट्रेकर्स ग्रुप राजमाचीकरांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
राजमाचीचा रस्ता झाला मोकळा
राजमाची गावाला जाणाऱ्या रस्तावर झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा झाला होता. त्यामुळे राजमाचीला जाणे अशक्य झाले होते. अशामध्ये कुणे गाव येथील डेला रिसॉर्ट या कंपनीचे जिमी मिस्त्री यांनी गणेश गिध यांच्या नेतृत्वाखाली जेसीबी आणि दोन चेन सॉ घेऊन सोबत सुमारे 20 कर्मचारी तातडीने रवाना केले. या सर्वांनी एका दिवसात हा बंद रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला. सोबतच गावामध्ये घरांवर धोकादायकरित्या पडलेली झाडे कापून दूर केली.