वसंतऋतू म्हणजे निसर्गाला मिळालेली संजीवनीच! निष्पर्ण झालेल्या झाडांना आता छान कोवळी पालवी फुटायला लागते.अंब्याला छान मोहर येतो. पांढरा चाफा नखशिखांत फुलतो. या सगळ्यांनी पक्षीसुध्दा भारावतात. कोकीळेचं कूजन ऐकून मन प्रसन्न होतं.
या वसंतऋतूची सुरवात प्रतिपदेला गुढी उभारुन झाली. या गुढीलासुध्दा पांढऱ्या चाफ्याची माळ घालतात. चाफा भरभरुन फुलतो आणि मुबलक फुलं मिळतात, ती याच दिवसात. हल्ली चाफ्याची झाडे पण कमी दिसतात. पूर्वी खूप झाडं दिसायची आणि त्याचं पडलेलं फूल दिसलं की, त्याचा वास घेऊन सहजपणेच छान अंगठी बनवुन हातात चारही बोटात घालायचो.
वसंतऋतूपासून झाडात जे बदल होतात, ते बघून मानवासाठीच झाडे आदर्श ठेवतात असं वाटतं. कालच एका झाडाकडे लक्ष गेलं, तर त्या झाडाला एका बाजूला वाळत आलेली पाने आणि काही निष्पर्ण फांद्या होत्या तर दुसऱ्या बाजूला पोपटी रंगाची कोवळी लुसलुशीत पाने होती. हीच ती चैत्रपालवी! एकाच झाडावर हा फरक बघून असं वाटलं की, ते झाड जणू सुचवतंय की “संयम ठेवा, आनंदाचे छान दिवस येत आहेतच.’
वसंत ऋतूत फुलणारी विविध फुले तर उन्हाळ्यात उर्मी देतात. लाल-केशरी फुलणारा गुलमोहर तर उन्हाच्या झळा सोसून छान बहरतो आणि त्याच्या त्या पोपटी, हिरव्या पानांमधे एकदम उठून दिसतो.
हा गुलमोहर बघून असं वाटतं,
उन्हाळ्याने केला कहर
तरी गुलमोहराला येतो बहर
संकटांनी केला कहर
तरी उमेदीला येऊ दे बहर…
पिवळ्या आणि लाल लालगुलमोहराची खाली पडलेली फुले बघून वाटते की, त्यांनी जणू काही धरीत्रीवर गालिचाच पसरलाय!
वसंतऋतुत पिवळा जर्द बहावा तर इतका बहरतो… त्याचे ते सोनसळी रुप बघतच बसावेसे वाटते. नववधूला हळद लावल्यावर जसं तेज चढतं; तशीच ही बहाव्याची फुले वसंतऋतुला तेजस्वी बनवतात. बहावा म्हणजे नववधूच आहे! त्या देखण्या बहाव्याच्या झाडाचे अगदी लगेचच मोबाईलमध्ये मस्त फोटो काढून ते शेअर करावेसे वाटतात.
मोगऱ्याची कळी संध्याकाळी हळूच हसते आणि तिच्या सुगंधानी सगळं वातावरण धुंद होतं. मोगरा म्हणजे निसर्गाने दिलेला ताजातवाना करणारा परफ्युमच!
वसंतऋतूत कैऱ्या मोठ्या होतात. मग साखरांबा, लोणचे, तक्कू जेवणाची लज्जत वाढवतात. कैरीचं पन्हं खूप छान लागतं आणि गरमागरम उन्हाळ्यात तृष्णा भागवतं.
वसंत ऋतूत चैत्र महिन्यात चैत्रगौर बसवली जाते. घरातल्या अन्नपूर्णा देवीला सजवल जातं.छान चैत्रांगण काढतात. पूर्वी घरासमोर अंगण असायचं. या अंगणात सारवून हे चैत्रांगण म्हणजे शुभचिन्हांच्या साहाय्याने रांगोळी रेखाटायचे. त्यात पाळण्यात गौरी, सूर्य, चंद्र, शंख, गोपद्म अशा वेगवेगळ्या चित्रांची एक मोठी रांगोळी काढली जायची. आता अंगण नसतं.
पण बायका फ्लॅटच्या पॅसेजमधे, घरात, जमेल तसे (किंवा छाप वापरून) हे चैत्रांगण काढून आपली संस्कृती जपत आहेत. चैत्र महिन्यात गौर बसल्या पासून अक्षतृतीयेपर्यंत एक दिवस चैत्रगौरीचं हळदीकुंकू केलं जातं. हळदीकुंकवाला आलेल्या महिलांना खिरापत, आंबे-डाळ आणि पन्हे देऊन भिजवलेल्या हरभऱ्यांनी ओटी भरतात.
वैशाख महिन्यात फळांचा राजा अंबा हजेरी लावतो.आमरस जेवणात एक वेगळीच लज्जत आणतो. वसंतऋतुतील निसर्ग उन्हाळ्यात आपल्याला ताजेतवानं रहायला मदत करतो.
या वर्षी “करोना’चं मळभ वसंतऋतूवर आलंय. त्यामुळे या वेळी वसंतऋतूचं स्वागत जरी दरवर्षी सारख झालं नाही, तरी कोकीळं तान लावून वसंताची ग्वाही देतोय. निष्पर्ण झाडाला आलेली चैत्रपालवी सुचवतेय हेही दिवस जातील.
– अचला धारप