पुणे (प्रतिनिधी):अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाची तिव्रता आज सकाळी कमी झाली. जळगाव,नाशिक धुळेसह पश्चिम विदर्भ आणि परिसरावर दुपार पर्यत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते पण कालांतराने ही प्रणाली आणखी निवळली.
निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास अलिबाग जवळ किनारपट्टीला धडकले वादळ धडकताना ताशी 110 ते 120 किलोमीटर चक्राकार वारे वाहून मुसळधार पाऊस पडला. हे वादळ मुंबईच्या दिशेने सरकणार होते पण अचानक त्याने मार्ग बदलला आणि ते रायगड ठाणे पुणे नगर नाशिक जिल्ह्यावरून पुढे सरकले.
या वादळाच्या मार्गावर येणाऱ्या फळबागा भाजीपाल्यासह शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे सुद्धा उन्मळून पडली. बुधवारी रात्री पर्यत या वादळाची तिव्रता अधिक होती. मध्यरात्रीनंतर त्याचा जोर ओसरत गेला. सकाळी तर त्याची तिव्रता आणखी कमी झाली होती पण पावसाच्या सरी मात्र कोसळत होत्या.