मुंबई : वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून दुपारी त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल. दरम्यान, हे ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकत आहे. सुरवातीला हे वादळ हरिहरेश्वर जवळ धडकण्याची शक्यता होती. मात्र, संध्याकाळपर्यंत यात बदल होऊन ते अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
जिल्हाधिकारी चौधरी यांनी याविषयी माहिती दिली. चक्रीवादळ १ जूनला येण्याची शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली होती. वेधशाळेने यापूर्वी श्रीवर्धनच्या हरिहरेश्वर येथे हे चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, आता त्याची दिशा बदलल्याने ते अलिबागच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.
शासनाकडून आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. ज्या अलिबाग आणि श्रीवर्धन तालुक्यांमध्ये आज तैनात आहेत. दरम्यान, आम्ही शासनाकडे अलिबागसाठी अतिरिक्त दोन एनडीआरएफच्या टीम पाठवण्यात याव्यात अशी विनंती केली होती. त्याला मान्यता मिळाली अूसन त्यानुसार या टीम पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता अलिबागमध्ये एकूण तीन एनडीआरएफच्या टीम काम करणार आहेत,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.