मुंबई : ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा बसला आहे. त्यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर अनेक ठिकाणी मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने खूप नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वादळाने पोल देखील पडले आहेत.
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, नवी मुंबई, कल्याण, ईगतपुरी,नाशिक जिल्ह्यातील वीजयंत्रणेला मोठा फटका बसला आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली असून सर्वप्रथम उपकेंद्रांचा वीजपुवठा सुरु केला जाईल व तेथून पुढे टप्प्या-टप्प्याने 11 केव्ही व लघुदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा लागणार आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा दिल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा मालवण तालुक्याला बसला असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
चक्रीवादळाचा नाशिकमध्येही महावितरणला मोठा फटका बसला आहे. दरम्यान वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू आहे. जिल्ह्यातील व शहरातील वाहिन्यांवर वृक्ष पडल्याने वीजखांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुरक्षेसाठी काही ठिकाणी वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. ग्राहकांनी संयम बाळगून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातही महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पोल पडून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. बंगलेवाडी, अलिबाग येथे दशरथ वाघमारे नामक व्यक्तिचा विद्युत पोल पडून मृत्यू झाला. श्रीवर्धन, अलिबाग, रोहा, पेण भागात मोठ्या प्रमाणात झाडं ही विद्युतवाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
दरम्यान उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळल्यास , वीज वाहिनी तुटल्यास किंवा रोहित्र जळाल्यास महावितरणच्या टोल फ्री नंबर 1800 233 3435 / 1800 102 3435 / 1912 वर त्वरित संपर्क करावा, असं आवाहन ट्वीट करत केले आहे.