आळंदी – आळंदी-मरकळ रस्त्यावर चऱ्होली खुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीत नैसर्गिक प्रवाह बुजविल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार रस्ता खराब होत असल्याने सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता केला आहे. यामुळे रस्ता चांगल्या स्थितीत राहिला असला तरी त्याचा बाजूने मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहत असून या पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.
मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास या प्रवाहाचा वेग वाढत असून त्यातून वाहन घालणे धोक्याचे ठरत आहे. या प्रवाहाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले असून मूळ ओढा बुजविण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी पाणी साचून ते रस्त्यावरून नेहमी वाहत असते यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्यातून मार्ग काढताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. नैसर्गिक प्रवाह बुजवून बांधकाम केल्याने येत्या काळात मोठा पाऊस झाल्यास पाण्याचा प्रवाह वळून मोठी दुर्घटना घडू शकते त्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
पुण्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच भागात नैसर्गिक प्रवाह बुजविल्या ठिकाणी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. आळंदी शहरात व लगतच्या ग्रामीण हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून पैशांच्या हव्यासापोटी नैसर्गिक प्रवाह असलेले नाले, ओढे बुजवून बांधकामे करण्यात आली, प्लॉटिंग करून ते विकण्यात आली आहेत. याकडे प्रशासन सकारात्मकपणे कधी पाहणार हा सवाल उपस्थित होत आहे.