पश्चिम महाराष्ट्राचा पठारी प्रदेश, ज्याला देश या नावाने ओळखले जाते आणि पश्चिम किनारपट्टीलगतचा कोकण भूप्रदेश यांना जोडणारे अनेक घाटरस्ते आपल्याला माहिती असतील. ऐन पावसाळ्यात या घाटांचे सौंदर्य, धबधबे, वळणदार रस्ता, दुतर्फा असलेली झाडी, धुक्याचे साम्राज्य हे जसे मनोहारी असते, तसेच दरडी कोसळणे, रस्ता खचणे, पूलावरुन पाणी जाणे अशा गोष्टींमुळेही प्रसिद्ध आहेत. अशाच काही महत्त्वाच्या घाटरस्त्यांविषयी…
आंबोली घाट –
कोल्हापूरहून निघालात की संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा ते सावंतवाडी या रस्त्यावरचा साधारण 30 किमीचा आंबोली घाट म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातील एक नमुनेदार पर्यटन स्थळ आहे. ओथला हत्तींचा वावरही मनाला भुरळ पाडणारा आहे. मुळात महाराष्ट्रात हत्ती फारसे आढळत नाहीत. मात्र इथे येणारे हत्ती उत्तर कर्नाटकातून येतात. हा घाट समुद्रसपाटीपासून 2000 फूट उंचीवर आहे. पावसाळ्यात धुके, धबधबे आणि प्रसंगी दरडी कोसळणे यासाठी हा घाट प्रसिद्ध आहे.
आंबा घाट –
कोल्हापूरहून निघून शाहूवाडी तालुका, पन्हाळा-विशाळगड किल्ला आणि मलकापूर मार्गे हातखंबा रत्नागिरी जोडणारा हा अंबा घाटही निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. अत्यंत वळणदार रस्ता, खोल दिसणारी कोकणातली गावे, धुक्याचे तलम पदर आणि कमालीची थंडी यामुळे हा घाटही पर्यटकांच्या पसंतीचा आहे. या घाटा त्या मानाने दरडी कोसळण्याच्या घटना कमी प्रमाणात आढळतात. या घाटाचे अंतरही 35 किमी आहे.
कुंभार्ली घाट –
कऱ्हाडहून निघून चिपळूणला घेऊन जाणारा जो राज्यमार्ग आहे, त्या मार्गावर दुर्गम समजला जाणारा कुंभार्ली घाट आहे. कऱ्हाडहून मल्हारपेठ, पाटण आणि कोयनानगरला कवेत घेऊन हा 40 किमीचा घाट आपल्याला पोफळीमार्गे चिपळूणात घेऊन जातो. चिपळूण शहर हे कोकणाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. या घाटातला रस्ता अवघड वळणांचा असून किमान तीन ते चार वळणांवर चालकांची कसोटी लागते. हा घाटही साधारणपणे 2200 फूट उंचीवर आहे. सुंदर धबधबे आणि अधूनमधून कोसळणाऱ्या दरडी हे या घाटाचे वैशिष्ट्य आहे.
आंबेनळी घाट –
महाबळेश्वरहून पोलादपूरला नेणारा हा घाट अत्यंत महत्त्वाचा घाट समजला जातो. मुंबईहून महाबळेश्वरला येता-जाता अनेकजण या घाटाची निवड करतात. वाटेत प्रतापगडाचे विहंगम दर्शन, वाडा कुंभरोशी आणि सावित्री नदीचे दरीतून जाणारे पात्र, महाबळेश्वरनंतर घाट ओलांडून दरीत उतरणारी कोयना नदी असे अनेक थांबे या 40 किमीच्या घाटात आहेत. महाबळेश्वर ते प्रतापगड आणि प्रतापगड ते पोलादपूर असे दोन टप्पे या घाटात आहेत. अवघड वळणे, हमखास दरडी कोसळणारा घाट आणि धुक्यासह प्रचंड थंडी या घाटात अनुभवण्यास मिळते.
ताम्हिणी घाट –
पुण्याहून मुळशी तालुक्यातून कोकणातल्या माणगावकडे उतरणारा ताम्हिणी घाट म्हणजे निसर्गसौंदर्याचा साक्षात्कारच आहे. सह्यादी पर्वतरांगेतला हा घाट कुंडलिका नदीला कुशीत घेत कोलाड या ठिकाणी संपतो. या घाटाची लांबी (16 किमी) कोकणात उतरणाऱ्या अन्य घाटांपेक्षा कमी असली तरी निसर्गसौंदर्याचा प्रत्यय, घनदाट जंगल आणि वळणदार रस्ते यामुळे हा घाट मनमोहक दिसतो.