पुणे, दि. 6 – रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून, “ग्लोबल वॉर्मिंग’चा वाढता धोका लक्षात घेता राज्यात डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सन 2025 पर्यंत राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 2016-17 मध्ये नैसर्गिक शेतीचे अभियान सुरू केल्यानंतर 9 लाख 50 हजार हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने होत आहे. दुसऱ्या टप्प्यात हे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषि व फलोत्पादन विभागाने आखलेल्या कार्यक्रमाला आवश्यक निधी देण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे नैसर्गिक शेती राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, नैसर्गिक शेती हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. 1905 मध्ये इंग्रज सरकारने अल्बर्ट हॉवर्ड यांना कृषी सल्लागार म्हणून पाठविले. त्यांनी पारंपरिक शेती विज्ञानाधारित असून त्यात चक्रीय अर्थव्यवस्था आहे, असे नमूद केले आहे. आपण नंतरच्या काळात अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्यासाठी उपयोगात आणलेल्या रासायनिक खतांमुळे उत्पादन वाढले, पण चक्रीय अर्थव्यवस्था मंदावली. त्यामुळे शेती फायद्याची होत नाही.
शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचवावी
नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन वाचेल, नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, देश आत्मनिर्भर बनून शेतकऱ्याला देखील लाभ होईल. त्यामुळे देशात नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्याबाबतची माहिती पोहोचवावी, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.