नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलनाला मंगळवारी 11 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. त्याचे औचित्य साधून शेतकरी संघटनांनी देशभरात निदर्शने केली.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी आणि अटकेच्या मागणीसाठी ती निदर्शने झाली. मोर्चे, दुचाकी रॅली, धरणे आदींच्या माध्यमातून निदर्शकांनी त्या मागणीकडे लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरीत एका वाहनाने चिरडल्याने चार शेतकरी मृत्युमुखी पडले.
ते वाहन मिश्रापुत्र आशिषचे असल्याचे उघड झाले. त्यावरून आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी मिश्रा यांना मंत्रिपदावरून हटवून अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने शेतकऱ्यांना निदर्शनांचे आवाहन केले होते.