पुणे – पुणे जिल्ह्यातील काही मतदारसंघाकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरक्षित बालेकिल्ले म्हणून पाहिले जात होते; परंतु लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची पुरती दमछाक झाली. आता, विधानसभा निवडणुकीत एकसंध नेतृत्वाचा अभाव तसेच इच्छुकांची वाढत असलेली संख्या पाहता राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लोकसभेपेक्षाही जास्त दमछाक होणार आहे. आघाडीचा मुद्दा अजूनही चर्चेतच असल्याने आणि भाजप तसेच शिवसेनेसह अन्य पक्षांनी विधानसभेची जय्यत तयारी केल्याने आपापल्या मतदारसंघातील पक्षाची मते राखण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे असणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचा पाया असलेल्या बारामतीचा विचार केला तर गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व केले आहे. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने पवार यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, बारामतीत पवार कुटुंबियांचा पराभव करणे कोणालाच शक्य नाही. हे त्यावेळी स्पष्ट झाले होते. यावेळी तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच पवार यांचा बारामतीत पराभव करता येणे अवघड असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, कदाचीत पवार यांना गाफील ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. कारण, राष्ट्रवादी पक्ष एक दिसत असला तरी तो एकसंघ नाही (पान 3 पहा)8
पवार यांनी गाफिल राहू नये…
बारामती विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांच्याकरीता सुरक्षित असल्याचे मानले जात असले तरी तालुक्यातील 22 गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यात गेल्या पाच वर्षांत आलेले अपयश, बारामती औद्योगिक वसाहतीतून अनेक उद्योग बाहेर तसेच काही बंद असल्याने वाढलेली बेरोजगारी यासह आरक्षण मुद्द्यांवरून धनगर समाजात राष्ट्रवादी विषयी सुरूवातीपासून असलेली नाराजी हे मुद्दे पवार यांना काहीसे अडचणीचे ठरू शकतात. त्यातही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला तसेच अन्य पक्षांच्या उमेदवारांचे आव्हान असेल तर पवार यांचे बारामतीतील मताधिक्य कमी होऊ शकते. युामळे पवार यांनाही गाफिल राहून चालणार नसल्याचे सांगितले जात आहे.
शिवतारे यांच्या त्रुटींचा समाचार…
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या वादात गेल्या विधानसभेच्या (2014) वेळी पुरंदमधील मतदारांनी सुवर्णमध्य म्हणून विजय शिवतारे यांना निवडून दिले होते. शिवतारे हे पुरंदर तालुक्याचे आमदारच नव्हे तर राज्यमंत्री आहेत. तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असले तरी गुंजवणी प्रश्न, विमानतळाची उभारणीही त्यांच्या बाजूने झुकणारी असली तरी त्यांच्या विरोधात एक गट सक्रीय आहेच. याशिवाय पुरंदर उपसा, जनाई-शिरसाई योजनेसह पुणे-जेजुरी रस्ता रूंदीकरण आदी प्रश्नांवरून शिवतारेंच्या त्रुटींचा समाचार विरोधी उमेदवार घेऊ शकतात.