नवी दिल्ली – सुखमित पालसिंग उर्फ सुख बिखारीवाल याचा गुन्हेगारी जगतात 2012मध्ये अंमली पदार्थ विक्रेता म्हणून प्रवेश झाला. मात्र या आठ वर्षात त्याने भारतातील मोस्ट वॉमटेड गुन्हेगारांच्या यादीत स्थान मिळवण्याएवढ्या काळ्या कारवाया केल्या आहेत.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी पाच दहशतवादी पकडले. त्यातील दोन जण शौर्यचक्र विजेते बलविंदरसिंग यांच्या हत्येत सहभागी होते. बिखारीवाल याच्या सुचनेनुसार या हत्या केल्याचे तपासात पोलिसांना आढळून आले आहे. बलविंदरसिंग हे पंजाबमधील दहशतवादाच्या विरोधातील महत्वाचा आवाज म्हणून ओळखले जात असत.
पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आलेल्या बिखारीवालने आयएसआयच्या मदतीने 2017मध्ये भारतातून पळ काढला. संयुक्त अरब अमिरातमध्ये तो सध्या दडी मारून बसला आहे. त्याच्या दोन साथिदारांना पकडल्यानंतर भारतीय प्रशासनाने त्याला हस्तांतरीत करण्याची मागणी त्या देशाकडे केली आहे. त्याला भारतात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक प्रकरणांमध्ये त्याला न्यायालयांनी फरार घोषित केले आहे, असे गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी सांगितले.
बिखारीवाल याच्यावर पंजाबमध्ये 13 गुन्हे नोंद आहेत. त्यातील सहा गुन्हे हे तर खून आणि खूनाचे प्रयत्न असे गंभीर आहेत. पाकिस्तानातील अमली पदार्थ विक्रेत्यांच्या तो निकटच्या संपर्कात होता.
भारतातून पळून गेल्यानंतर आयएसआयने त्याचे जाळे धार्मिक कट्टरतावाद्यांच्या विरोधात असणारे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या हत्येसाठी वापरण्यास सुरवात केली.
त्यामुळे बिखारीवाल हा स्थानिक गुन्हेगार कसे दहशतवादी बनतात, याचे उत्तम उदाहरण आहे. 2017 पर्यंत त्याचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नव्हता, अशी पुस्तीही या अधिकाऱ्याने जोडली.
बिखारीवाल याला संयुक्त अरब अमिरातीहून भारतात हस्तांतरीत करण्याच्या प्रक्रियेची लवकरच सुरवात करण्यात येईल. पाकिस्तानने आता पंजाबमधील गुन्हेगारांना हाताशी धरून दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या मोड्यूलचे नेतृत्व बिखारीवाल करत आहे. बिखारीवालने भारत सोडल्यानंतर तो आखातातील अनेक देशांत फिरत होता. सध्या संयुक्त अरब अमिरातमधून तो सूत्रे हलवत आहे. खलिस्तान विरोधी नेत्यांची हत्या करण्याचे टार्गेट त्याला आयएसआयने दिले आहे.
बिखारीवालला हत्या करणारे, हत्येत सहभागी असणारे, गॅंगवॉरमध्ये गोळीबार करणारे, चोऱ्या करणाऱ्या आणि शस्त्र कायद्यांचे गुन्हे दाखल असणाऱ्यांना टोळीत सहभागी करून घेण्याच्या सूचना आयएसआयने दिल्या आहेत.
आपल्या दहशतवादी कृत्याचा माग लागू नये म्हणून या दहशतवादी संघटना डिस्कोर्ड सारख्या ऍपचा वापर करत आहेत. ते टेलिग्राम सारखे ऍपही वापरत नाहीत, असे गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला ताब्यात घेतल्यास पंजाबमध्ये दहशतवाद सुरू करण्याच्या आयएसआयच्या प्रयत्नांना तडाखा बसणार आहे.