राज्यात 302 केंद्र : 94,513 विद्यार्थ्यांनी केली आहे नोंदणी
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दि.17 नोव्हेंबर रोजी राज्यातील 302 केंद्रांवर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा होणार आहे. एकूण 94 हजार 513 विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी नोंदणी झालेली आहे.
इयत्ता दहावीत शिक्षक असलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येते. राज्यस्तरावर या परीक्षेसाठी 7 हजार 90 शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यापूर्वी झालेल्या परीक्षेला 86 हजार 281 विद्यार्थी बसले होते. यातील 262 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. तर, देशातून 2 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली होती.
मागील परीक्षेच्या तुलनेत यंदा त्यात 8 हजारांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर दि. 15 ऑक्टोबरपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. शाळांनी लॉग-इन करुन प्रवेशपत्रे डाऊनलोड करून त्यांची प्रिंट काढून ती विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवरच सोपविण्यात आलेली आहे. मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांना काही अडचणी आल्यास त्यांनी परीक्षा केंद्र संचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले आहे.
असे असेल वेळापत्रक
पुणे जिल्ह्यातील 21 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. पहिला पेपर सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 यावेळत तर दुसरा पेपर दुपारी 1.30 ते 3.30 या वेळेत होणार आहे. प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील. त्यांना गुणही 100 असणार आहे.